मंगळवार, ०६ ऑगस्ट
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायीनी ठरलेले भंडारदरा आणि निळवंडे धरण भरले आहे. त्यामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडून दुष्काळग्रस्त भागाला पाणी देताना सर्व बंधारे भरून द्यावे, मागणी काँग्रेस नेते निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
थोरात यांनी म्हटले आहे की, निळवंडे धरणाची निर्मिती दुष्काळी भागातील १८२ गावांसाठी केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणार आहे. गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे ओव्हरफ्लो झाले आहेत. मात्र निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने लाभ क्षेत्रातील ओढे नाले अद्यापही कोरडे आहेत.
पर्जन्य छायेत असलेल्या संगमनेर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला असून तळेगावसह दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. आता धरण ओव्हरफ्लो झाल्याने अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्याने दिले गेले पाहिजे. लाभक्षेत्रात कमी झालेला पाऊस आणि पाणीटंचाई यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडावे त्यामुळे या भागातील बंधारे भरून घेता येतील.
पावसाळ्यात देखील तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचविणे देखील जिकरीचे झाले आहे. पावसाची अशाश्वती आणि पुढील काळातील नियोजन याकरता निळवंडे कालव्यामधून येणाऱ्या ओहरफ्लोच्या पाण्यातून संगमनेर, राहता, कोपरगाव, राहुरी या तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना भविष्यातील समस्यांमधून काहीसा दिलासा मिळणार आहे.
तरी प्रशासनाने कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्याला पाणी सोडून दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव भरून द्यावे, अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.


