सोमवार, २६ ऑगस्ट
संगमनेर – साने गुरुजी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त संगमनेरच्या साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठानच्यावतीने साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त राजाभाऊ आवसक यांनी दिली आहे.
येत्या शुक्रवारी (३० ऑगस्ट) सकाळी ९ ते ४ या वेळेत संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील काशेश्वर विद्यालयात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे आवसक यांनी म्हटले आहे.
नानांच्या जयंती वर्षानिमित्ताने साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारीत विषय सर्व गटातील स्पर्धकांसाठी देण्यात आलेले आहेत. स्पर्धेचे हे ४१ वे वर्ष आहे. इयत्ता तिसरी ते चौथी, पाचवी ते सहावी, सातवी ते आठवी, नववी ते दहावी, अकरावी ते बारावी व खुला गट अशा एकूण सहा गटांत या स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना रोख बक्षिसे, स्मृतीचषक, साने गुरुजींचे साहित्यपर पुस्तके देण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प प्रमुख सोमनाथ मदने, सहप्रकल्प प्रमुख भाऊसाहेब शिंदे, अर्जुन वाळके, रजत आवसक, नम्रता पवार, सुखदेव इल्हे, गोरक्ष जाधव आदींनी केले आहे.

