सोमवार, २६ एप्रिल | अनंत पांगारकर
संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या काळात अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा होती, मात्र संगमनेरकरांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. दोन मटका टपऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना पंधरा दिवसाचा कार्यकाळ उलटून देखील अवैध धंद्यांचे माहेरघर असलेल्या ‘शक्तिमान टॉवर’चा पत्ता सापडलेला नाही.
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी वादग्रस्त ठरलेल्या एलसीबी विरोधात केलेल्या उपोषणानंतर जिल्हा पोलीस दलात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे फेरबदल करण्यात आले. या फेरबदलात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या जागेवर नगरहून पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती केली. पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांनी शहर पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेतला आणि त्या पाठोपाठ लगेचच त्यांची डीवायएसपी पदावर बढती मिळून नाशिकला बदली झाली, तरीदेखील संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार त्यांच्याकडेच कायम आहे.
त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागी अद्याप जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नव्या पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली नसल्याने महाजन यांनी पदभार सोडलेला नाही. ते निवडणुका पार पडेपर्यंत पोलीस ठाण्यात कायम असतील अशीदेखील चर्चा आहे. महाजन यांच्यासमोर संगमनेरमध्ये काम करताना अनेक आव्हाने आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी ते नेमके काय करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र शहरातील अशांततेचे मूळ असलेले अवैध धंदे त्यांच्या कार्यकाळातही सुखनैव सुरूच असल्याचे दिसते.
गेल्या आठवड्यात पोलीस डायरीनुसार झालेल्या नोंदीतून त्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनंतर त्यांच्या पथकाने संगमनेरमध्ये १७ ऑगस्टला संध्याकाळी नाटकीनगर आणि नेहरू चौकात सुरू असलेल्या टपरीतील मटका अड्ड्यांवर कारवाई करत प्रत्येकी ७१० रुपये आणि ६१० रुपये आणि मटक्याचे साहित्य ताब्यात घेतले. नाटकीनगर येथील कारवाईमध्ये रफिक सलीम शेख (रा. खांडगाव, संगमनेर) आणि नेहरू चौकातील कारवाईमध्ये राम शंकर अंकम (रा. पद्मनगर, संगमनेर) या दोघांना पकडण्यात आले होते. मात्र यामागील या व्यवसायाचे मूळ सूत्रधार त्यांना चौकशीत देखील निष्पन्न करता आलेले नाही.
असे असले तरी शहर पोलीस ठाण्यापासून आणि पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयादरम्यान मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगतचे शक्तिमान टॉवर्स अद्याप सापडलेले दिसत नाही. एकाच वेळी येथे पाच-सात कारवाई होऊ शकतात. शक्तिमान टॉवर्समध्ये सुरू असलेल्या अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायाकडे अद्याप त्यांच्यासह संपूर्ण पोलीस प्रशासनाचे लक्ष गेल्याचे दिसत नाही.
बहुचर्चित शक्तिमान टॉवरसह संगमनेरच्या अनेक भागात मटका, गुटखा, जुगार, गांजा विक्री, बनावट दारू, लोटो, बिंगो, अवैध कॅफे हाऊस, भंगार दुकाने, गोवंश कत्तलखाने, दुचाकी चोऱ्या, मंगळसूत्र गंठण, दागिने, चोऱ्या, बेकायदा प्रवासी वाहतूक, वाळू तस्करी, गौण खनिज तस्करी संबंधित अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या वरदहस्ताने सुरूच आहे. त्यामुळे कोणी कितीही आवाज उठवा पोलिसांसह संबंधित यंत्रणेचा आम्हाला मुक्त आशीर्वाद असल्याने आमचे कोणीच काही करू शकत नाही, या अविर्भावात आता अवैध धंदे चालक-मालकांची दादागिरी वाढू लागली आहे.
सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर शहराला असंस्कृत बनविणाऱ्या या अवैध व्यवसायांवर कारवाया केल्यास संगमनेरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल. मात्र या अवैध व्यवसायावर कारवाया करण्याची मानसिकता संबंधित अधिकाऱ्यांकडे दिसत नाही.


