विशेष प्रतिनिधी / मुंबई
मंगळवार, २७ ऑगस्ट
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. सत्ताधाऱ्यांच्या घिसाड घाईमुळेच पुतळा उध्वस्थ झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेने केंद्र सरकारबरोबरच नौदल आणि राज्यातल्या सरकारची छी थू होऊ लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी ४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणमध्ये नौदल दिनानिमित्त येऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना करण्याकरिता शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण केलं होतं. पंतप्रधानांनी अनावरण केलेला हा महाराजांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींतून तीव्र नाराजी व्यक्त होतेय.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांच्यासह संतप्त शिवप्रेमींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करून निषेध केला. पुतळ्याचं अनावरण केल्यावर तो सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देण्यात आला होता. मात्र त्याची अपेक्षित निगा न राखल्याने पुतळा कोसळल्याचं सांगितलं जातं. याचा जाब विचारायला पोहोचलेल्या वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यलयाची तोडफोड केली.
देशाचे पंतप्रधान जेंव्हा एखाद्या स्मारकाचे तथा वास्तूचे उद्घाटन करतात तेंव्हा त्याचे काम दर्जेदारच असेल अशी जनतेला खात्री असते. परंतु सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वर्षभरातच कोसळला. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. एक वर्षही पुर्ण न होता हा पुतळा कोसळला त्याअर्थी त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं हे उघड आहे. एकार्थाने ही देशाची फसवणूक असल्याची भावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे. या पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं का झालं यासह इतर अनेक गोष्टींची कसून चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला. हा पुतळा बसवला त्याचवेळी माझ्यासारख्या अभ्यासकाने या पुतळ्याच्या सौष्ठवाबद्दल तसेच मजबुतीबद्दल आक्षेप घेतला होता. हा पुतळा शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारत नाही. याबद्दलही त्यावेळेला सावंत यांनी पोस्ट लिहून माहिती लोकांसमोर आणली होती. पण याकडे सबंधितांकडून दुर्लक्ष करण्यात आलं. त्यानंतर ३-४ फेब्रुवारी २०२४ ला सावंत यांनी पुतळ्याला भेट दिल्यानंतर हा पुतळा जास्त काळ टिकणार नाही, असं सांगितलं होतं. हे शिल्प बदलावं असं निरीक्षण नोंदवलं होतं.
नौदलासारख्या प्रख्यात आस्थापनेनं केलेलं काम हे चिरंतन व्हायला पाहिजे. ते मजबूत आणि सुंदर असायला हवं होतं. भारताचे पंतप्रधान जर एखाद्या गोष्टीचे उद्घाटन करत असतील, ती आंतरराष्ट्रीय बातमी होत असेल तर त्याच्या मजबूतीकडे गांभिर्याने लक्ष दिलं पाहिजे होतं. शिवछत्रपतींचं स्मारक हे घाई गडबडीत तयार करून शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता. पण हे करत असताना या पुतळ्याच्या सौंदर्य आणि मजबुतीकरण याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी केला.
शिवछत्रपतींचं स्मारक हे जमीनदोस्त झालेलं पाहून भारताची – भारतीय नौदलाची प्रतिमा चांगलीच डागाळली आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी आणि हा पुतळा मंजूर केला त्या एजन्सी आणि पुतळा बसवणारे यांच्या हेतूविषयी आता आपल्याला शंका घेण्यास जागा आहे. ज्यांनी हा अपराध केला त्यांना आपण शिक्षा करणार आहोत का, असा प्रश्नदेखील इतिहासकार सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून सरकारला विचारला आहे. या घटनेने भारतीय नौदलाची काय प्रतिमा झाली असेल!
पुतळा पडल्यानंतर आमदार वैभव नाईक आक्रमक झाले असून त्यांनी याप्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यानंतर नाईक यांनी हातात रॉड घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसची तोडफोड देखील केली. दरम्यान, पुतळा कोसळल्यानंतर आमदार वैभव नाईक म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला आहे. शिवरायांचा पुतळा पडल्याचे आम्हाला दुःख होत असून शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभारण्यात आला. काम सुरू होते तेव्हा देखील स्थानिकांनी कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्याकडे तेव्हा दुर्लक्ष करण्यात आले. आणि याचा परिणाम आज आपण समोर पाहात आहोत, असे ते म्हणाले. ज्या शिवरायांचे किल्ले अजूनही शाबूत आहेत त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आज झालेली अवस्था ही अस्वस्थ करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.


