शुक्रवार, ३० ऑगस्ट
संगमनेर : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष देवराम पवार यांची तलाठी कार्यालयात निघृणपणे हत्या करण्यात आली. या हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या संगमनेर शाखेच्यावतीने गुरुवारी (२९ ऑगस्ट) काम बंद ठेवत निषेध करण्यात आला. संघटनेच्यावतीने तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी संगमनेर शाखेचे अध्यक्ष गणेश शिंदे, कार्याध्यक्षा योगिता शिंदे, उपाध्यक्ष अनिल कुंदेकर, सरचिटणीस बाबासाहेब नरवडे, सह सरचिटणीस संग्राम देशमुख, खजिनदार रोहिणी कोकाटे, हिशेब तपासणीस भीमराज काकड, संघटक प्रशांत हासे, सदस्य पोमल तोरणे, विक्रम ओतारी, अनिल आव्हाड, भालचंद्र वैद्य, आर. एम. मुळे, संतोष लंके, डी. बी. भालचिम, डी. ए. शेख, महिला प्रतिनिधी मंगल डोंगरे, माधुरी नामदे, मंडल अधिकारी सदस्य आय. एन. शेख, के. बी. खाडे, एस. आर. चतुरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या संगमनेर शाखेच्यावतीने तहसीलदारांना दिलेले निवेदन नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी स्वीकारले.
बुधवारी (२८ ऑगस्ट) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयात तलाठी संतोष पवार यांच्यावर भ्याड हल्ला करीत त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे राज्यभरात मंडलाधिकारी, तलाठी यांच्यात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेने निषेध करत ही एका तलाठ्याची हत्या नसून समग्र महसूल व्यवस्थेची हत्या असल्याची महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेची धारणा झाली आहे, असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान तलाठी पवार यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी प्रताप जगन्नाथ करहाले याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहे.
काय होती घटना…
आरोपी प्रताप करहाले याच्या नावावर असलेली शेत जमीन तलाठी पवार आरोपीच्या नातेवाईकांच्या नावावर करत असल्याचा संशय आरोपीला होता. त्यावरून आरोपी आणि तलाठी यांच्यात वाद उद्भवला होता. बुधवारी अचानक आरोपीने तलाठी कार्यालयात येत हातातील मिरची पावडर तलाठी पवार यांच्या डोळ्यात फेकली. पाठोपाठ आरोपीने हातातील चाकूने तलाठ्याच्या पोटात वार करत हत्या केली. आणि घटनास्थळावरून पळून गेला. या संदर्भात पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


