निळवंडे धरण, कालवे नक्की कोणी केले हे जनतेला माहिती
सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा उत्साहात
रविवार, दि. ०१ सप्टेंबर
संगमनेर – अनेक अडचणींवर मात करत आपण निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम केले, मात्र ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते आता फोटो काढत आहे. मात्र वस्तुस्थिती तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. भेदभाव निर्माण करत चांगल्या वातावरणात काही लोक विष कालविण्याचा प्रयत्न करत असून सत्तेचा गैरवापर करत दहशत निर्माण करत आहे. मात्र अशाप्रकारे दहशत निर्माण करणाऱ्यांचा पुढील काळात बंदोबस्त करू, अशा शब्दात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विरोधकांना फटकारले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची ५७ वी वार्षिक सभा थोरात यांच्या उपस्थितीत रविवारी पार पडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, युवा काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदींचे विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात म्हणाले, निळवंडे धरण पूर्णत्वास घेताना आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत पॅटर्न आपण राबवत प्रकल्पग्रस्तांना सन्मान दिला. त्यांना संगमनेर तालुक्यात जमिनी दिल्या. सहकारी संस्थांमध्ये चांगल्या पदावर नोकऱ्या दिल्या, या कामात आपल्याला ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांची मदत झाली. मात्र आज जे लोक फोटो काढत फिरत आहे, त्यांनी धरणाच्या कामात कोणतेही योगदान दिल नाही. इंचभर जमीन प्रकल्पग्रस्तांना दिली नाही की त्यांना एकही नोकरी दिली नाही. त्यामुळे निळवंडेचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत आहे.
चिंचोली गुरव येथील परिषदेतून दादांनी निळवंडे धरणासाठी पाठपुरावा केला व धरण, कालव्यासाठी आपण अविश्रांत काम केले. आज सुदैवाने चांगला पाऊस झाला असून सर्व धरण भरले आहे. चार रोटेशन होऊ शकतात अशी आजची परिस्थिती आहे. वितरिकांचे काम बाकी असून ते आपल्यालाच करायचे आहे. निळवंडेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देणे हे आपले ध्येय आहे.
जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे राज्यात आणि देशात आपला सन्मान होतो आहे, हे काहींना पहावत नसल्याने ते सातत्याने संगमनेर तालुक्यात विष कालवण्याचा प्रयोग करत आहेत. अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. ५४ कार्यकर्त्यांवर खोट्या गुन्ह्यातून केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. ते तालुक्यात दहशत निर्माण करू पाहत आहेत. मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे त्यांचा बंदोबस्त आपण नक्कीच करू. संगमनेरच्या विकासाबरोबर त्यांची तिथली दहशत कमी करून तिथेही जनतेमध्ये आनंद निर्माण करू. आपण साडेसहा वर्ष महसूल मंत्री राहिलो कधीही कोणाची अडवणूक केली नाही. तालुक्यात विरोधकांच्या संस्था उभ्या राहिल्या त्याच्या मंजुरी आपण दिल्या. सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे ही आपली संस्कृती आहे हेच काम आपल्याला पुढे चालू ठेवायचे आहे.
बाबा ओहोळ, डॉ. जयश्री थोरात यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. वार्षिक सभेत बाळासाहेब देशमुख, संग्राम जोंधळे, दौलत गडाख, विकास सहाने, भास्कर वर्पे, कॉम्रेड तात्याबा बोराडे, रोहिदास डेरे, ज्ञानदेव गडगे, सुधाकर गुंजाळ यांनी सहभाग घेतला.
सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.



