मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर
मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना आता ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी (२ सप्टेंबर) यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे. राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन २०२४-२५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने १ जुलै २०२४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एक कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ अशी होती. ही मुदत संपल्याने योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरण्यास ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.
★
३ महिन्यांचे एकत्रित पैसे मिळणार
लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३ हजार रुपये म्हणजेच योजनेचे दोन हप्ते जमा केले आहेत. मात्र काही महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जांची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहे. ही छाननी ३१ ऑगस्टपर्यंत सुरू होती. त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जांची छाननी झाली आहे, अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जून, जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण तीन महिन्यांचे ४५०० रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. मात्र सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा लाभ मिळेल असे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
★
पैसे मिळाले नाही तर करावे?
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना अद्यापही पैसे आलेले नाहीत. कारण त्यांच्या अर्जाची छाननी बाकी असेल किंवा त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला असला. त्यामुळे ज्या महिलांना अर्ज करूनसुद्धा खात्यात पैसे आले नाहीत, अशा सर्वांना नारीशक्ती शक्ती ऍपमधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करून यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपल्याद्वारे सबमिट केलेल्या संपूर्ण अर्जाची यादी दिसेल. यात मंजूर, नामंजूर, प्रलंबित, नाकारलेले असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर पाहता येईल. यानंतर नामंजूर असलेल्या सर्व लाभार्थ्यांना अर्ज रद्द होण्याचे कारण पाहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. तसेच नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म संपादित करावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे अर्ज एकदाच दुरुस्त करता येणार आहे. त्यामुळे महिलांना अर्ज करताना खबरदारी घ्यावी लागेल. तसेच अर्ज जुलै आणि ऑगस्टमध्ये भरलेल्या महिलांना मागील महिन्याचे पैसे मिळणार आहेत.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा. – आदिती तटकरे, मंत्री.


