प्रांताधिकारी, तहसीलदारांनीही केली ठेकेदाराची कान उघाडणी, तरीही पडेना फरक
संगमनेर – अनंत पांगारकर
नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथे सध्या महत्त्वाच्या ठिकाणी साईड रस्ते आणि साईड गटारी काढण्यात येत असून ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचा गंभीर आरोप हिवरगाव पठार भागातील नागरिकांनी केला आहे. सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे रस्त्यावरील पाणी नागरिकांच्या घरामध्ये, दुकानांमध्ये शिरले आहे. यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूंचे व दुकानातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या कामाकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने या विरोधात महामार्गावरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
साईड गटाराचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या संदर्भात संबंधित काम करणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजरला अनेकदा फोन करून देखील फोन उचलले जात नाही. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांनी या तक्रारीचे गांभीर्याने दखल घेत संबंधितांची कान उघाडणी केली असली तरी अद्याप फारसा फरक पडला नसल्याचे दिसते. पावसामुळे साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट संबंधित ठेकेदाराने न लावल्यास परिसरातील ग्रामस्थ आता नासिक पुणे मार्गावर रास्ता रोको आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती हिवरगाव पठारचे सरपंच किरण भागवत यांनी दिली.


भागवत म्हणाले, पावसामुळे गुलाब मोमीन यांच्या हॉटेलमध्ये, घरात मोठ्या प्रमाणात पाणी आणि गाळ साचल्याने घरातील वस्तूंचे आणि हॉटेलमधील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच साकुर फाट्यावरील रहिवासी बाळासाहेब मदने यांच्या दुकानात देखील पाण्यामुळे अक्षरशः चिखल निर्माण झाल्याने दुकान बंद ठेवण्याची वेळ आली आहे. हॉटेल अमरजीत मध्ये देखील कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे.
सध्या सुरू असलेला परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून हवामान खात्याने मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना संबंधितांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे आणि तहसीलदार धीरज मांजरे यांनी नुकसानग्रस्त घरांचे आणि दुकानांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तलाठ्याला दिले आहे.



