शेतकऱ्याकडे मागितले दीड हजार रुपये
कृषी अधिकाऱ्यांच्या पत्राची कंपनीने दखल घेत पैसे मागणाऱ्या प्रतिनिधीवर केली कारवाई
गुरुवार, २६ सप्टेंबर
पिक विमा असल्याने शेतातील पिकाचा पंचनामा करण्यासाठी संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीने शेतकऱ्याकडे दीड हजार रुपयांची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमधून समोर आला आहे. या संदर्भात शेतकऱ्याने कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पत्राची दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील शेतकरी विश्वास दातीर यांनी इन्शुरन्स कंपनीकडे खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत पिक विमा काढला होता. पिक विम्यास पात्र असल्याने त्यांनी संबंधित कंपनीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित कंपनीने आपला प्रतिनिधी पिकाच्या पंचनाम्यासाठी या शेतकऱ्याकडे पाठवला.
पंचनामा करण्यासाठी संबंधित प्रतिनिधीने या शेतकऱ्याकडे दीड हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे शेतकरी दातीर यांनी यासंबंधीची तक्रार संगमनेर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांच्याकडे केली होती. पंचनाम्यासाठी पैशांची मागणी केल्याचा प्रकार गंभीर असल्याने गोसावी यांनी तातडीने संबंधित विमा कंपनीला पत्र पाठवत प्रतिनिधी विरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.
तालुका कृषी अधिकारी यांच्या पत्राची गंभीर दखल घेत संबंधित कंपनीने शेतकऱ्याकडे पैसे मागणाऱ्या प्रतिनिधीची हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.



