गुरुवार, २६ सप्टेंबर
राहाता – माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते? मंत्रिमंडळात तुम्हीही होता मग का नाही बोललात? संगमनेरमधून आम्ही भूमिका घेत समन्यायीबद्दल विरोध दर्शविला. महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेलमध्ये टाकले नाही. असं स्पष्ट करत गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल अशी टीका माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर केली.
गणेश सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर पार पडली. यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.

व्यासपीठावर सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवानेते विवेक कोल्हे, कृषी भूषण प्रभावतीताई घोगरे, कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे, उपाध्यक्ष विजय दंडवते, माजी चेअरमन व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते ॲड. नारायणराव कार्ले, श्रीरामपूर दूध संघाचे अध्यक्ष सुधीर म्हस्के, गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे, महेंद्र शेळके, अविनाश दंडवते, विक्रांत दंडवते आदींसह माजी संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले, आम्ही येथे चांगले करण्यासाठी आलो आहोत. या भागात असणारे पाणी आणि जनजीवनाशी निगडित समस्या सोडविण्यासाठी जे शक्य असेल ते प्रयत्न आमचे आहेत. गणेश साखर कारखाना अनेक अडचणींवर मात करून पुढे जात आहे. आर्थिक घडी बसविताना संजीवनी आणि संगमनेर यांची मदत असेलच, त्यामुळे येणाऱ्या हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक गाळप करण्यात कारखाना यशस्वी होईल.
मागील गळीत हंगामात राजकीय विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरीही कारखाना चांगला चालवून दाखवला. यापुढे देखील कारखाना उत्कृष्ट कार्यक्षमतेने चालविला जाईल. कारखान्यासाठी ऊस जास्त कसा वाढेल यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. सर्वांनी जिद्द दाखविली म्हणून मागील गळीत हंगाम यशस्वी पार पडला त्याबद्दल युवा नेते विवेक कोल्हे व संचालक मंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे पण गणेश कारखान्यात इतिहास का घडला हे विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले.

विवेक कोल्हे म्हणाले, गणेश कारखान्याचे जुने साहित्य पूर्वीच्या काळात कसे विकले, याची चौकशी करण्यासाठी तक्रार केलेली आहे. कारखाना जिल्ह्यात सर्वोत्तम चालावा यासाठी प्रयत्नशील आहे. ऊस वाढीसाठी सभासदांनी मोहीम हातात घेऊन जास्तीत जास्त ऊस वाढवला पाहिजे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारा कारखाना आपण करून दाखवला. कारण सर्वांची जिद्द होती. मागील कालखंडात काय राजकारण झाले हे सर्वांना ठाऊक आहे. कशा अडचणी निर्माण केल्या गेल्या हे सर्वांना ज्ञात आहे.
संस्था नफ्यात येण्यासाठी आपली सामूहिक शक्ती महत्वाची आहे. गणेश परिसरातील काही बंधारे भरले आहेत. मात्र काही अद्याप भरणे बाकी आहे. येत्या काळात त्याकडे आपले लक्ष असणार आहे. कारखाना चांगला चालला पाहिजे, यासाठी विविध माध्यमातून सहाय्य उभे करण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी राजकीय पाठबळ गरजेचे असते. यापुढे जो गणेश कारखानाच्या हिताच्या आड येईल त्याला येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा इशाराही कोल्हे यांनी दिला.


