इंदापूरमधून उमेदवारीही झाली निश्चित, पारंपरिक लढत रंगणार!
सोमवार, ०७ ऑक्टोंबर
काँग्रेस सरकारमधील तत्कालीन माजी मंत्री आणि इंदापुरातील बडे प्रस्थ असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतानाच त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आता इंदापूरमधून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार असतील.
इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार आदींच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला.
प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरच हर्षवर्धन पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता इंदापूरातून पाटील हे “तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धी दत्ता भरणे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची लढत होईल.

२०२३ च्या जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार यांच्या समावेत जाणाऱ्या चाळीस आमदारांमध्ये इंदापूरचे तत्कालीन आमदार दत्ता भरणे यांचा देखील समावेश होता. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून भरणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महायुतीत जागा वाटपात ही जागा पवार गटाकडे जाणार असल्यामुळे भाजपकडून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या हर्षवर्धन पाटलांची मोठी कोंडी झाली होती.
अखेरीस कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार ठाम असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
नुकत्याच झालेल्या आणि राज्यभरात लक्षवेधी ठरलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना २५ हजारांचे मताधिक्य होते. याचा धागा पकडत पक्षप्रवेशावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्या आधीच्या तीन निवडणुकांमधील विजयामध्ये आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. परंतु गेल्या निवडणुकीत आमचा सहभाग अदृश्य होता. सुनेत्रा पवार यांचा बारामतीतील पराभव आणि इंदापूरातील सुप्रिया सुळे यांच्या मताधिक्यामागे कोण होतं ते पाटील यांनी यावेळी सांगून टाकलं.

जयंत पाटील म्हणाले…
आजच्या कार्यक्रमाची गर्दी पुढील विधानसभेचे निकाल सांगून जाते. २०१९चा एक काळ असा होता की, आमच्याकडून एक एक नेता पक्ष सोडून जात होता. त्यावेळी मी राज्यात सर्वत्र सांगत होतो की, जीवनातून जग निर्माण करण्याची ताकत ज्यांच्याकडे आहे ते शरद पवार नावाचे विद्यापीठ आपल्याकडे आहे. एकदा नाही तर चार वेळा त्यांनी सिद्ध करून दाखवल. महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्त केली तेव्हा तेव्हा शरद पवारांनी मराठी स्वाभिमान दाखवून दिला. स्वाभिमानी माणसे आज पवारांच्या मागे आहे.


