देशातील सव्यासाची उद्योगपती, देशाभिमानी रतन टाटा यांची दोनच दिवसांपूर्वी एक्झीट झाली. देशासाठी सारंकाही करण्याची उमेद असलेला टाटांसारखा उद्योगपती झाला नाही होणार नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्यांची आहे. तरूणांचं व्यासपीठ समजल्या जाणार्या सोशल मिडियावर नव्वदीतला हा उद्योगपती सामान्यांच्या सुख दु:खात सहभागी होतो. प्रचंड संपत्तीचा मालक असलेल्या या महायोग्याला श्रीमंतीचा माज नाही की प्रसिध्दीचा सोस. या महान उद्योगपतीची एका विशीतल्या तरुणाशी दोस्ती होणं हे कल्पनेबाहेरील सत्य आहे. हीच दोस्ती भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतीला सोशल मीडियावरचा स्टार बनवून गेली.
शंतनू नायडू हे त्या तरूण दोस्ताचं नाव. शंतनूनेच टाटांना सोशल मिडियाच्या जगाशी जोडलं. या तरुणाच्या आग्रहामुळेच टाटा अखेरच्या काही वर्षांत सोशल मीडियावर तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनले. टाटा यांचा सोशल मीडियावरील वावर हा इंटरनेट वापरकर्त्यांचा आवडीचा विषय बनला. सोशल मीडियावरील खात्यांवर ते कधी स्वत:चा जुना फोटो, कधी त्यांच्या कुत्र्यांचे फोटो तर कधी आपल्या कुटुंबाचे फोटो पोस्ट करायचे. या फोटोंना तितकंच रंजक आणि विनोदी कॅप्शन देखील द्यायचे. मागच्या पाच दशकांपासून भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या आणि वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात नाव कमावलेल्या या उद्योगपतीचं खासगी आयुष्य कसं आहे, याची झलक त्यांच्या चाहत्यांना मिळावी, यातून त्यांना प्रेरणा घेता यावी, यासाठी मी त्यांना सोशल मीडियाचा वापरायचा सल्ला दिला होता, असं शंतनू सांगतो.
घनिष्ठ मित्र बनलेले शंतनू आणि रतन टाटा हेअरकट ठेवण्यापासून चित्रपट बघण्यापर्यंत सगळ्या गोष्टी सोबत करत. शंतनू सांगतो की त्यांची ही मैत्री लोकांसाठी जितकी आश्चर्यकारक होती तितकीच त्यांच्यासाठी मौल्यवान देखील होती. पुढे रतन टाटांचा सहाय्यक म्हणूनही शंतनूने काम केलं. ते कडक शिस्तीचे बॉस, दूरदृष्टीचे मार्गदर्शक आणि तितकेच समजूतदार मित्रदेखील होते. मोठे डोळे आणि कुरळ्या केसांचा हा अवघ्या २५ वर्षांचा मुलगा जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांमध्ये गणल्या जाणार्या रतन टाटा यांचा इतका जवळचा सहकारी आणि मित्र कसा बनला?
मी टाटामध्येच कामाला होतो. आमच्या चार पिढ्या या टाटा उद्योगाशी जोडल्या गेल्या आहेत. साक्षात टाटा समुहाच्या प्रमुखांसोबत जोडलं जावू याची मलाही कल्पना नव्हती. तशी माझी रतनजींबरोबरील भेट हा केवळ योगायोगच होता. श्वान प्रेमाचा धागा या भेटीला कारणीभूत ठरला.
टाटामध्ये काम करत असतानाच सामाजिक उपक्रमही मी चालवायचो. भटक्या कुत्र्यांना शोधून त्यांच्या गळ्याभोवती चमकणारा रेडियमचा पट्टा बांधला जात असे. जेणेकरून हे कुत्रे गाडीचालकांना रात्रीसुद्धा दिसू शकतील. अंधारात गाड्यांसमोर कुत्रे आल्याने अनेकदा अपघात होतात. यात अनेक कुत्रे गंभीर जखमी होतात किंवा मरणही पावतात. असे अपघात रोखण्यासाठी ‘मोटोपॉज’ उपक्रम सुरू केला. श्वानप्रेमी असलेल्या रतनजींच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. त्यांनी पत्र पाठवून मला बोलवून घेतलं. भटक्या कुत्र्यांची काळजी आणि श्वानप्रेम हा आम्हाला जोडणारा समान धागा ठरला.
भटक्या कुत्र्यांना पाळणारा कोणी पालक मिळावा. त्यांना अन्न, निवारा आणि प्रेम मिळेल हा यामागचा उद्देश. कॉलेजच्या सहकारी मित्रांना सोबत घेत आमचा हा उपक्रम सुरू होता. यानिमित्ताने माझी रतनजींबरोबर पहिली भेट झाली. रतनजींची साथ मिळाल्याने मोटोपॉज हा उपक्रम वेगाने वाढला. कामानिमित्त सुरू झालेला आमचा संपर्क हळूहळू वाढत गेला. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर कामाव्यतिरिक्तही आम्ही एकमेकांच्या वैयक्तिक गोष्टींबाबत गप्पा मारू लागलो. मैत्री फुलत असताना मला भारत सोडावं लागलं. शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घरच्यांनी घेतला. पण यामुळे रतनजींबरोबर कोणताही दुरावा आला नाही. उलट दूरच्या व्यक्तीविषयीची आत्मियता वाढते असं म्हणतात तशी जवळकी वाढत गेली.
रतनजी ज्या विद्यापीठात शिकले त्याच कॉर्नेल विद्यापीठात मलाही शिक्षणाची संधी मिळाली. अमेरिकेत असताना मी रतनजींबरोबर फोन आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्कात होतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यापीठात पदवीदान समारंभ होता. या समारंभाची माहिती रतनजींना मी सहज म्हणून दिली. ते या समारंभाला येतील, याची किंचितही माहिती मला नव्हती. पण ते खरंच आले. माझा तर सुरुवातीला विश्वासच बसला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी भारतात परतलो आणि रतनजींनी मला त्यांचा सहाय्यक म्हणून नेमून टाकलं. मुंबईत एक प्राण्यांसाठी खास हॉस्पिटल उभारावं हे रतनजींचं फार जुनं स्वप्न होतं. या प्रकल्पावर काम करायला मी सुरूवातही केली. काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटल तयार होऊन त्याचं अनावरण देखील करण्यात आलं.
रतनजींसोबत काम करायची संधी मिळणं ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी होती. तरुणांसोबत काम करायला रतनजीही खूप उत्सुक असायचे. तरुणांबरोबर काम करताना आपल्याला ऊर्जा मिळते, असं रतनजी सांगायचे. मलाही त्यांच्या उत्साहाचा अनेकदा अनुभव आला. मेहनती असण्याबरोबरच संवेदनशीलता जपणार्या तरूणांची आज देशाला गरज आहे, असं रतनजी नेहमी बोलून दाखवत. रतनजी हे कामाच्या बाबतीत अतिशय तत्पर आणि शिस्त पाळणारे होते. त्यांच्या कार्यालयातील बैठकांचे मुद्दे मी वहीत नोंदवून त्याचा अंमल आणि नियोजनाची आखणी करायचो. दिवस सुरू होताच दिवसभरात कोणकोणती कामं करायची याची यादी त्यांच्याकडून निश्चित करून घ्यायचो. ठरलेली कामं पूर्ण करण्याची जबाबदारी मी घ्यायचो.
कामात हलगर्जीपणा त्यांना अजिबात आवडत नसे. कोणतंही काम मध्येच सोडून दिलं किंवा विश्रांती घेतली, असं मी कधीच पाहिलं नाही. टाटा उद्योग समुहाव्यतिरिक्त रतनजींनी ७३ भारतीय स्टार्टअप उद्योगांमध्ये गुंतवणूक केली होती. आज प्रचंड यशस्वी ठरलेल्या ओला कंपनीवर विश्वास दाखवलेल्या मोजक्या गुंतवणूकदारांमध्ये रतनजी एक होते. उद्योजक किंवा उद्योगाची क्षमता ओळखून तिला चालना देण्याची दूरदृष्टी रतनजींकडेे होती.
माझ्या सल्ल्याने आणि मदतीने रतनजींनी स्वत:चं इंस्टाग्राम खातं उघडलं होतं. आपल्या खाजगी आणि वैयक्तिक जीवनातील पैलू चाहत्यांपुढे ठेवण्याबरोबरच उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शनही ते इन्स्टाग्रामवरील पोस्टमधून करायचे. इंस्टाग्रामचा वापर नेमका कसा करायचा हे मी रतनजींना समजून सांगितलं. पुढे ते इंस्टाग्रामशी अधिक जोडले गेले. त्यांनी आपले तरूणपणीचे जुने फोटो टाकत आठवणींना उजाळा दिला. या फोटोंना दिलेल्या नवनव्या कॅप्शन आणि हॅशटॅग प्रचंड गाजले. नव्वदीकडे येत असतानाही उद्योगातील प्रत्येकजण मित्रत्वाच्या नात्यानेच त्यांच्याकडे ओढला जायचा.
रतनजी आणि मलाही अॅक्शन कॉमेडी चित्रपट खूप आवडायचे. ‘द अदर गाईज’ आणि ‘द लोन रेंजर’ सारखे चित्रपट आम्ही सोबतीनेच पहायचो. नेटफ्लिक्सवरील फौदा ही इस्त्रायली लष्करावर आधारलेली सिरीज त्यांना खूप आवडायची.
कुठलीही गोष्ट मला खटकली अथवा नाराज असलो की मी पहिल्यांदा रतनजींना फोन करायचो. ते सुद्धा त्यांना येणारी अडचण किंवा आनंदाचे क्षण माझ्याशी शेअर करायचे. रतनजींच्या रुपाने अंधारातून प्रकाशाची वाट दाखवणारा मार्गदशक गमावल्याची भावना आहे. रतनजींच्या जाण्याने मी अत्यंत जवळचा मित्र गमावला. त्यांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणं मला शक्य नाही. मी त्यांचा शतश: ऋणी आहे… (साभार: बीबीसी)
संकलन : प्रवीण पुरो

