मंगळवार, १५ ऑक्टोबर
संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. समृद्ध म्हणून गौरविल्या जाणाऱ्या तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायच असल्याचे प्रतिपादन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या युवा संवाद यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारो तरुणांच्या सहभागाने तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
युवा संवाद रॅलीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे पदाधिकारी गावागावातील युवकांची संवाद साधत आहे. तरुणाईचा उत्साह ,ज्येष्ठ नागरिक, महिला यांची मोठी उपस्थिती हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरत आहे.
यात्रेदरम्यान जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अविश्रांत कामातून संगमनेर तालुका हा आज समृद्ध म्हणून गौरवला जात आहे. सुसंस्कृत राजकारणाची, व सर्वधर्म समभावाची समृद्ध परंपरा आपल्या तालुक्याला लाभली आहे.
येथील सहकार, शिक्षण व्यवस्था, समाजकारण, राजकारण, बाजारपेठ, आर्थिक समृद्धी, शेतीतील प्रगती हे राज्यासाठी दिशादर्शक आहे. आमदार थोरात यांनी जीवनाचे ध्येय म्हणून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. हे पाणी दुष्काळी भागात आले आहे. बाजारपेठ फुलली आहे.
संगमनेर तालुका आमदार बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्यात शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, महिला, व्यापारी, विद्यार्थी असे गुण्यागोविंदाने नांदत आहे. हे वातावरण आपल्याला असेच ठेवायचे आहे.
तालुक्याची प्रगती रोखण्याकरता बाहेरून अनेक हल्ले होतील. हे सर्व हल्ले एकजुटीने रोखायचे आहेत. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत. त्यांना तालुका पूर्ण माहीत नाही. निवडणुकीसाठी खोटे बोलणारे लोक आता येणार आहेत. त्यांना त्यांची वेळीच जागा दाखवा असे आवाहन त्यांनी केले.



