त्यांचे समर्थकच सांगतात… संगमनेर चांगले तर खरी दडपशाही त्यांच्याकडेच!
राहता तालुका देखील आता दहशतमुक्त करायचाय!
थोरात यांचा शुभारंभानंतर प्रथमच युवा संवाद यात्रेत सहभाग
शुक्रवार, २५ ऑक्टोंबर
संगमनेर – गोरगरिबांना चांगले जीवनमान मिळवून देण्यासाठी येथील राजकारण आहे. राज्यभरात सुसंस्कृत आणि प्रगतशील अशी संगमनेरची ओळख निर्माण झाली आहे. मात्र त्यांच्या तालुक्यात खऱ्या अर्थाने दहशत निर्माण करणारेच लोक इकडे येऊन खोटे आरोप करतात. त्यांच्या तालुक्यात जाऊन त्यांच्या समर्थकांना विचारा ते सांगतील राज्यात संगमनेर सगळ्यात चांगला तर खरी दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे. दडपशाहीच्या जोरावर त्यांचे राजकारण इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न असून या दडपशाहीच्या व्हायरसला इकडे येऊ द्यायचे नाही, असे आवाहन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
घुलेवाडी येथे युवा संवाद यात्रेच्या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. जयश्री थोरात यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्री थोरात यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले.
थोरात म्हणाले, सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम संगमनेर तालुक्यात केले आहे. याउलट राहता तालुक्यात त्यांची मोठी दहशत आहे. कोणी विरोधी बोलले तर तंगड्या मोडल्या जात आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांना विचारले तर ते सुद्धा सांगतील की संगमनेर तालुका हा सर्वात चांगला तर सर्वात दडपशाही राहता तालुक्यामध्ये आहे.
मी आठ वेळेस आमदार राहिलो. सातत्याने जनतेचे काम केले विरोधकांचाही सन्मान केला. कधीही कुणाला आडकाठी निर्माण केली नाही. यांनी आपल्यावर बोलावे? हे एकदा दक्षिणेत खासदार झाले तरी लोकांनी यांना त्यांची जागा दाखवली. इकडे येऊन विकासाच्या गप्पा करतात. २०१४ मध्ये आपला बायपास पूर्ण झाला. नगर-मनमाड हा गचक्यांचा रस्ता अजूनही खड्ड्यांचा रस्ता म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. खासदार, आमदार, मंत्रीपदे अशी घरात सत्ता असून काही करता आले नाही. आता ते एमआयडीसीबद्दल बोलत आहे मात्र त्यांची ही एमआयडीसी फक्त निवडणुकीपुरती आहे.
पैशाच्या जोरावर ते इकडे येऊन नागरिकांना खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा संगमनेर तालुका स्वाभिमानी आहे. कधीही विकला जाणार नाही. निळवंडे धरण, कालवे आपण पूर्ण केले. या कामांमध्ये आडकाठी निर्माण करण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. हे सर्वश्रुत आहे. आणि तोडून मोडून आलेल्या सरकारच्या जोरावर पाणी सोडले आणि सांगतात की काम कोणी केले हे महत्त्वाचे नाही तर पाणी आम्ही सोडले असे ते सांगतात. अरे ही काय पद्धत आहे का.
मागील अडीच वर्षात संगमनेर तालुक्यातील जनतेला खूप त्रास दिला. परंतु स्वाभिमानी जनता त्यांच्यापुढे झुकली नाही. सर्वांना आपल्या तालुक्याची चांगली संस्कृती, राजकारण, समाजकारण जपायचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातून सर्वात मोठा विजय मिळवण्यासाठी काम करावे. याबरोबरच राहता तालुका देखील आपल्याला आता दहशतमुक्त करायचा आहे असेही सांगितले.

