शनिवार, २६ ऑक्टोबर
माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ खुर्द येथील युवा संकल्प मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्याविषयी खालच्या पातळीवर आक्षेपार्ह विधान करून वाद ओढवून घेतला. ही संगमनेरच्या राजकारणाची संस्कृती नसून या घटनेचा निषेध करत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख कैलास कासार यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
‘महाराष्ट्र संवाद न्यूज’शी बोलताना कैलास कासार म्हणाले, निवडणूक अथवा कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्याचा, कामांबद्दल प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार राज्यघटनेने सर्वच नागरिकांना दिला आहे. मात्र ही टीकाटिप्पणी करताना कुठल्याही महिला संदर्भात बोलताना शब्दांचा संयम बाळगणे गरजेचे आहे. माइक हातात आला म्हणून काहीही बोलत सुटायचे हे योग्य नाही.
सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण सुरू असून त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे माजी खासदार सुजय विखे पाटील संगमनेर तालुक्यात युवा संकल्प मेळावा घेत आहे. महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत. मात्र निवडणुकीच्या विषयावरून स्थानिक आमदारांना प्रश्न विचारणे, त्यांच्या कार्यक्षमतेबाबत टीका टिप्पणी करणे आणि आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवणे हा सर्वांचाच अधिकार आहे. शब्दांचा संयम बाळगून राजकीय व्यासपीठावरून भाषणे होणे अपेक्षित आहे. 
देशमुख यांनी भाषणावेळी डॉ. जयश्री थोरात यांच्या विषयी केलेल्या विधानामुळे तालुक्यात सर्वत्र संताप निर्माण झाला आहे. थोरातच नव्हे तर कोणत्याही महिलेविषयी अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे आपली बौद्धिक पातळी खालावल्याचे लक्षण आहे. तालुक्यात अशा प्रकारे महिलांवर अथवा त्यांच्या चारित्र्यावर टीकाटिप्पणी करण्याचे प्रकार कुठल्याही व्यासपीठावरून होणे योग्य नाही याची देखील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
सदरचा प्रकार महायुतीच्या व्यासपीठावरून घडला असला तरी महायुतीतील घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्याचे समर्थन करत नाही उलट घडलेला प्रकार हा निषेधार्हच असल्याने त्याचा निषेध करत असल्याचे व सध्याच्या राजकारणाची पातळी घसरत असल्याचे दिसू लागले आहे असे देखील शेवटी कासार यांनी म्हटले आहे.

