महिला शक्ती एकवटली, हजारो महिलांनी पोलिसांना दिले निवेदन
रविवार, २७ ऑक्टोबर
संगमनेर – धांदरफळ येथील सुजय विखे यांच्या सभेमध्ये युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यावर अत्यंत खालच्या पातळी टीका करणाऱ्या वसंत देशमुख व महायुतीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी केली असताना त्यांना सोडून माझ्यावरच गुन्हे दाखल होत आहेत. हा कुठला न्याय आहे. मला अटक करा, पण आमच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या. अशी मागणी करत महाराष्ट्रात मुली आणि बहिणींची अशी सुरक्षितता आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात यांनी सरकारला विचारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून डॉ. जयश्री थोरात व दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील हजारो महिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन निवेदन दिले. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.
महिलांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. तातडीने आरोपींना अटक करावी व खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी त्यांनी मागणी केली असे जर झाले नाही तर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावागावांमध्ये तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा हजारो महिलांनी दिला आहे.
जयश्री म्हणाल्या, महाराष्ट्रात महिलांचा सन्मान झाला पाहिजे. ही राज्याची परंपरा आहे. युती सरकार लाडक्या बहिणी म्हणून योजना राबवत आहेत. मात्र महाराष्ट्रातील मुली आणि बहिणी खरच सुरक्षित आहेत का. सभेमध्ये माझ्यावर आणि तमाम महिला भगिनींचा अपमान करणारे बेताल वक्तव्य महायुतीचे पदाधिकारी करत होते आणि अनेक जण टाळ्या वाजवत होते. हे महाराष्ट्राला शोभणार आहे का, अशा विकृत माणसांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे ते सोडून माझ्या संरक्षणार्थ आलेल्या कार्यकर्त्यांवर राजकीय सूडभावनेतून खोटे गुन्हे दाखल केले जात आहे.
मला न्याय द्यायचा सोडून माझ्यावरच गुन्हे दाखल होतात हा कुठला प्रकार आहे. खरंच महाराष्ट्रात मुली आणि महिला सुरक्षित आहेत का असा मोठा प्रश्न आहे. माझ्याविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी रात्रभर आंदोलन केले तरी कोणतीही नोंद घेतली गेली नाही. आम्ही लोकशाही मार्गाने मागणी करतो तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात. माझ्या संरक्षणार्थ उभे राहिलेल्या सर्व भावांना यामध्ये अडकवले आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहे.
त्यापेक्षा मलाच अटक करा. मी इथेच थांबते. लाडक्या बहिणी आणि लाडक्या मुली म्हणतात आणि मग त्याचे रक्षण करणे केले जात नाही. तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल करतात हेच सरकारचे काम आहे का. प्रशासन काय करते आहे. खोटे गुन्हे दाखल करू नका, तातडीने खोटे गुन्हे मागे घ्या. असे झाले नाही तर मी येथून हलणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, ग्रामीण पोलीस स्टेशन समोर सर्व जमलो होतो. मागणी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने होती अशा वेळेस गुन्हे दाखल होतात. येथे कायद्याचे राज्य शिल्लक आहे की नाही हाच हा प्रश्न आहे. मणिपूर आणि बिहारसारखी महाराष्ट्राची स्थिती झाली आहे.

