
रविवार, ०३ नोव्हेंबर
संगमनेर – शनिवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी संगमनेरमध्ये एका सजविलेल्या बैलगाडीत महात्मा बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी बळीराजाची पूजा तसेच पुष्पवर्षाव करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बळीराजाच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती. राजाभाऊ अवसक, सिताराम राऊत यांच्या हस्ते मिरवणूक मार्गावर पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
बस स्थानकाच्या प्रवेशद्वारापाशी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकी दरम्यान अनिकेत घुले, राहुल जऱ्हाड, दत्ता ढगे, संदीप काकड, लोकपंचायतचे अध्यक्ष थोरात, शाहीर तुळशीराम जाधव यांनी चळवळीतील गाणी म्हटली.

मिरवणुकीमध्ये राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकपंचायत, भारत ज्ञान विज्ञान समूह आदी क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग होता.
जाणून घ्या… बलीप्रतिपदेच्या दिवशी का काढली जाते बळीची मिरवणूक…
बळीराजाची संस्कृती हीच भारताची मूळ संस्कृती आहे. साडेतीन हजार वर्षांपूर्वी भारतात महात्मा बळीराजाची सिंधू संस्कृती नांदत होती. जिचे नामांतर पुढे अरबांनी हिंदू संस्कृती असे केले. हडप्पा, मोहेंजोदडो येथे सापडलेली संस्कृती म्हणजेच प्राचीन भारताची सिंधू संस्कृती आहे. या संस्कृतीत वर्णभेद व जातीभेद नव्हते. आर्य भारतात येण्यापूर्वीची ही संस्कृती आहे. वैदिक संस्कृतीपेक्षाही खूप प्राचीन अशी सिंधू संस्कृती आहे. 

आर्य भारतात आल्यानंतर मूळची सिंधू संस्कृती आणि आर्यांची वैदिक संस्कृती यांचा संघर्ष झाला. या संघर्षाचे पुरावे वेद उपनिषदे रामायण, महाभारत या ग्रंथांमध्ये पाहायला मिळतात. सिंधू संस्कृती ही स्री प्रधान, कष्टकऱ्यांना न्याय देणारी, कृषीप्रधान होती. सिंधू संस्कृतीतील आद्य गणमाता निरूती व तिची पुत्री दुर्गा यांनी शेतीचा शोध लावला. सिंधू संस्कृतीतील गण समाजात शेतीतून होणारे अन्नधान्याचे वितरण सर्व गणांमध्ये समान पद्धतीने विभागले जात असे. गण समाजाचे नेतृत्व निरूती व तिच्या वारस दुर्गा, अंबा, लक्ष्मी, सीता, द्रौपदी यांनी केले. त्यांनी शेतीचे पाणी अडवून बागायती शेतीचा शोध लावला.
सिंधू संस्कृतीतील गण समाजात वर्णभेद व जातीभेद नसल्याने तो समाज अत्यंत सुखासमाधानाने जगत होता. परंतु पुढे इराण, अफगाणिस्तान मार्गे आर्यांची आक्रमणे झाल्याने आर्यांनी स्थानिक गण समाजाच्या जमिनीवर अतिक्रमण सुरू केल्याने भारतात वैदिक विरुद्ध अवैदिक संघर्ष सुरू झाला. आर्यांनी इंद्राच्या नेतृत्वाखाली सिंधू संस्कृतीतील नगरे जाळली, धरणे फोडली, स्त्रियांवर अत्याचार केले. सिंधू संस्कृतीतील निरूतीचे वारसदार कश्यप, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद, विरोचन, बळीराजा, बाणसूर अशी ही अवैदिक परंपरा आहे. परंतु इसवी सनाच्या पहिल्या शतकात वैदिकांनी कपटाने सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यांनी खोट्या कथा रचून सिंधू संस्कृतीतील राक्षस, दैत्य उर्फ असुरांना बदनाम केले, त्यांना खलनायक ठरवले. 

महात्मा बळीराजा हा एक महान प्रजाहितदक्ष, न्यायी व समतावादी असुर राजा होता. वैदिक आर्यांनी कपटाने त्याच्या वंशजांना संपवून सत्ता हस्तगत केली. वैदिकांनी लिहिलेल्या भाकड कथांपैकी एक बळी व वामनाची कथा आहे. सिंधू उर्फ हिंदू धर्मातील वेदांपासून रामायणापर्यंत सर्व धर्मग्रंथांमध्ये हा वैदिक विरुद्ध आयुर्वेदिक संघर्ष दिसतो. अवैदिक समतावादी सिंधू संस्कृतीवरील वैदिक विषमतावादी संस्कृतीचे आक्रमण व प्रभाव पुसून टाकण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी दिवाळीच्या व बलिप्रतिपदेच्या काळात बळीराजा महोत्सव साजरा केला जातो.

