गुरुवार ०७ नोव्हेंबर
विशेष प्रतिनिधी / मुंबई
तेरा वर्षांपूर्वी हत्या झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री प्रमोद महाजन पक्षाच्या राजकारणात वरचढ ठरू नये यासाठी त्यांचा घात करण्यात आला. यामागे गृहकलश असल्याच्या वावड्या उडवल्या जात होत्या. मात्र त्यात जराही सत्य नव्हतं. ते एक षडयंत्र असल्याचा खळबळजनक दावा प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन यांनी केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांची २००६ साली त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हा ही हत्या गृहकलहामधूनच झाल्याची त्यावेळी चर्चा केली जात होती. मात्र, प्रमोद महाजन यांची कन्या आणि माजी खासदार पूनम महाजन यांनी वडिलांची हत्या ही कौटुंबिक विषय किंवा द्वेष भावनेपोटी नव्हती, असा दावा केला. ते एक मोठं षडयंत्र होतं, असा दावा एका माध्यमाशी बोलताना केला.
पूनम महाजन यांनी मुलाखतीत अनेक दावे केले आहेत. माझ्या वडिलांची हत्या झाली तेव्हा हा कौटुंबिक विषय असल्याचं चर्चा होती. मात्र, प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द पुढे जाऊ नये, यासाठी षडयंत्र होतं. त्यांना रोखण्यासाठी संपवण्यात आलं. एवढेच नाहीतर माझे लोकसभेच्या वेळी तिकीटही कापण्यात आलं. तेही एक मोठं षडयंत्र होतं. पण हे षडयंत्र कोणी रचलं? हे असं कोणी का केलं? याच्या शोधात मी बसत नाही. मात्र, हे षडयंत्र आज नाही तर उद्या एक दिवस बाहेर येईल. मी माझ्या कामाला प्राधान्य देते, असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे पूनम महाजन यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे यावर बोलताना म्हणाले, पूनम महाजन यात षडयंत्र होतं असं म्हणत असतील तर, चौकशी झाली पाहिजे. त्यावेळी मी स्वतः प्रमोद महाजन यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये होतो. त्यावेळीही त्यांची हत्या कौटुंबिक वादातून झाली, अशी चर्चा होती. त्यावेळी चौकशी झाली. पण चौकशीतून काही बाहेर आलं नाही. तेव्हा म्हणावी तशी चौकशी झाली नाही. पण आता जर पूनम महाजन यांनी हा दावा केला असेल तर सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, असं एकनाथ खडसे म्हणाले. प्रमोद महाजन हे आमच्यासाठी मोठे मार्गदर्शक होते. त्यांची हत्या झाल्यानंतर आम्हाला धक्का बसला होता. त्या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलो नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.
दरम्यान, पूनम महाजन यांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया दिली आहे. जर त्यांच्याकडे काही पुरावे किंवा तसे कागदपत्र असतील तर त्यांनी ते सरकारला द्यावेत. सरकार त्याची नक्कीच चौकशी करेल. याच्यात कोण जर दोषी असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे मुनंगटीवार यांनी म्हटलं आहे.

