यात्रेत दोन हजारावर तरुण-तरुणींचा सहभाग
विधानसभा निवडणूक तालुक्याच्या अस्मिता आणि स्वाभिमानाची
शुक्रवार, ०८ नोव्हेंबर
संगमनेर – संगमनेर तालुका हा कायमच शांतताप्रिय आहे. परंतु या तालुक्यातील जर कोणी येथील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला यापुढील काळात जशास तसे उत्तर दिले जाईल. येथील विधानसभा निवडणूक संगमनेर तालुक्याच्या अस्मितेची आणि स्वाभिमानाची असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले.
राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात नवव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्या प्रचारार्थ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी संगमनेर शहरात युवा संवाद यात्रा काढण्यात आली होती. दिवसभर शहराच्या सर्वच भागात सुरू असलेल्या या यात्रेत दोन हजारावर तरुण-तरुणींचा सहभाग होता. अनेक ठिकाणी यात्रा जाण्याच्या मार्गावर जेसीबीमधून फुलांची उधळण करण्यात आली तसेच ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत अभूतपूर्व स्वागतदेखील करण्यात आले. यात्रेमुळे तरुण-तरुणीमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
संगमनेर नगर परिषदेजवळून माळीवाडा येथील क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार प्रदान करून युवा संवाद यात्रेची सुरुवात करण्यात आली. डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, डॉ. हर्षल तांबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले होते.
जयश्री थोरात म्हणाल्या, हा तालुका स्वातंत्र्य सैनिकांचा तालुका आहे. गेली चाळीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार बाळासाहेब थोरात करत आहे. मतदारसंघात केलेल्या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा नवव्यांदा महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विधानसभेच्या निवडणुकीस उभे आहे. त्यांना तालुक्यातील मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ही निवडणूक तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची असून निवडणुकीच्या या महोत्सवात तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या आनंदाने सहभागी झाला आहे. आजच्या मोटार सायकल रॅली मधील उत्साह हेच दर्शवतो. संगमनेर करांचा थोरात यांना मोठा पाठिंबा मिळत असून राज्यातील विक्रमी मताधिक्य मिळविण्यासाठी काम करण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
आमदार बाळासाहेब थोरात हे कधीही निवडणूक म्हणून काम करत नाही. प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा हा त्यांचा ध्यास आहे. निवडणूक संपली की दुसऱ्या दिवसापासून कुटुंबप्रमुख म्हणून ते पुन्हा आपल्या कामाला सुरुवात करतात. पाच वर्षांसाठी आपले काम करत असताना यापुढील पंधरा दिवस मात्र आपण त्यांच्यासाठी निवडणुकीत काम करण्याची आवश्यकता आहे. – दुर्गाताई तांबे.

राज्यात महाविकास आघाडी असल्याने संगमनेरमधील शिवसैनिक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने पूर्णपणे उभे आहेत. त्यांच्या प्रचारात सक्रिय आहे. खेड्यापाड्यात घरोघरी जाऊन काम करत आहे. संगमनेर शहराला थेट निळवंडे धरणातून शुद्ध पाणी देणारे थोरात यांचे एकमेव नेतृत्व असून त्यांच्या पाठीशी हा तालुका भक्कमपणे उभा राहणार आहे. या तालुक्यात गद्दारांना थारा नसून समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आत्तापर्यंत किती पक्ष बदलले याचा मतदारांना अभ्यास करावा लागेल. – अमर कतारी.

