सोमवार, ११ नोव्हेंबर
संगमनेर – राजकारणाच्या हल्लीच्या बजबजपुरीतील नेत्यांची ओळख टक्केवारीमुळे होत आहे. मात्र संगमनेरच्या नेतृत्वाची ओळख राज्यभरात कर्तुत्वाने होत आहे. राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व असलेल्या आमदार थोरात यांनी सततच्या विकास कामातून तालुक्याचा कायापालट केला आहे. सुसंस्कृत नेत्यांची परंपरा जपणारे हे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले. 
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी काँग्रेस, महाविकास आघाडीच्या वतीने देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या युवक निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, बाळासाहेब थोरात स्वर्गीय मुख्यमंत्री बाळासाहेब देशमुख यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. थोरात यांनी सततच्या विकास कामांमध्ये दुष्काळग्रस्त असलेल्या संगमनेर तालुक्याचा कायापालट केला आहे. संगमनेरमधील मतदारांनी त्यांच्या विक्रमी मताधिक्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख, शरद पवार अशा समृद्ध नेतृत्वाची परंपरा आहे. ही परंपरा थोरात यांनी राजकारणात जपली आहे. आमच्या लातूरच्या जनतेने देखील थोरात यांच्यावर सातत्याने प्रेम केलं असून थोरात यांना महाराष्ट्राचा सुसंस्कृत नेता अशी ओळख मिळाली आहे. त्यांनी संगमनेरची ओळख राज्यातच नव्हे तर देशभरात निर्माण केली आहे.
सध्याचे राज्यातील महायुतीचे सरकार सर्वात भ्रष्टाचारी सरकार असून या सरकारला खाली खेचण्याबरोबरच संगमनेरकरांनी थोरात यांना राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.

