शुक्रवार, १५ नोव्हेंबर
मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी केला. निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे पूर्ण करून पाणी दिले, ज्या लोकांनी अडथळे निर्माण केले ते आता येथे येऊन विकासाच्या बाता मारत आहे. तुमचे वडील इकडे खासदार होते. ३५ वर्षात त्यांनी काय केले हे आधी सांगा. तुमचा खोटारडेपणा संपूर्ण राज्याने पाहिला असून मागील अडीच वर्षात तुम्ही तालुक्याचा छळ केला. पालकमंत्री हा मालक नसतो असे स्पष्ट करतानाच तुमची दडपशाही इकडे चालू शकणार नाही असा थेट इशारा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे नाव न घेता दिला.
विधानसभा निवडणूक प्रचारार्थ संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील सभेत थोरात बोलत होते. सिताराम पावसे अध्यक्षस्थानी होते. डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शिवसेनेचे कैलास वाकचौरे, दिलीप साळगट आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले, संगमनेरकरांनी कायम आपल्यावर प्रेम केले म्हणून राज्यात काम करण्याची संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या समन्वयाची राज्याची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मी राज्यभर फिरत होतो. माझा मतदारसंघ कार्यकर्त्यांनी सांभाळला. ज्यांना त्यांच्या मतदारसंघातील रस्ता नीट करता आला नाही ते इकडे येऊन विकासाच्या गप्पा मारत आहे.
धांदरफळच्या सभेत वाईट बोलणाऱ्याला यांनी प्रोत्साहन दिले. ती घटना अत्यंत दुर्दैवी होती. यामुळे अवघ्या दहा मिनिटात संगमनेर तालुका पेटून उठला. इकडे येऊन वाईट बोलले. संगमनेर तालुका कुणाच्या वाटेला जात नाही आणि कुणी आमच्या वाटेला गेले तर सोडत नाही. त्यावेळेस हे कुपाटी-कुपाटीने पळाले.
हे टायगर-बिबट्या वगैरे काहीच नाही. बिबट्या म्हणून बिबट्याचा अपमान करू नका असे सांगताना संगमनेर तालुक्याची अस्मिता काय आहे हे त्यांनी आता पाहिले आहे. या सर्व प्रकाराची दुरुस्ती केली जाईल. तालुक्याचा विकास थांबविण्यासाठी यांनी खडी क्रेशर बंद केले. रस्त्यांची कामे बंद पाडली. हजारो मजूर रस्त्यावर आणले. अनेकांवर विनाकारण खोटे केसेस दाखल केल्या.
आपल्या येथील काही लोक त्यांना इकडे आमंत्रण देतात. विरोधक यामागे होते. विरोधकांचा आपण सन्मान केला पण दहशतवाद इकडे बोलावणे, हे अत्यंत चुकीचे आहे. म्हणून त्यांचा हल्ला आपण परतू लावलाच पण राहत्यामध्ये जाऊनही यापण दुरुस्त करणार आहोत.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात राज्यात काम करतात. मी तालुक्यात जनतेत फिरले. मी काय चूक केली त्यामुळे ते माझ्या विरुद्ध बोलले. त्यांच्या कृतीने संपूर्ण तालुका पेटून उठला. यात माझे भाऊ माझ्या मागे उभे राहिले. त्यांच्यावर ३०७ चे गुन्हे दाखल झाले. हा कुठला अन्याय आहे. मी आठ तास पोलीस स्टेशन बाहेर उभी होते. मात्र माझी केस घेतली गेली नाही, उलट माझ्यावरच केस टाकली. ही दडपशाही आपण सहन करायची नाही. सर्वांनी २० तारखेला एकजुटीने मोठ्या मताधिक्याने आमदार थोरात यांना विजयी करा.

