सोमवार, १८ नोव्हेंबर
संगमनेर – संगमनेर तालुका हा एकनिष्ठ विचारांचा आहे. आमदार बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाशी तर संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करून सरकार स्थापन केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेरमध्ये पाऊल ठेवू शकणार नव्हते. मात्र त्यांच्या नावाखाली तालुक्यातील तरुणांना बनवाबनवी करून संगमनेरात बोलावून फसवले. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेचा बार फुसका ठरल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.
कतारी यांनी म्हटले आहे की, सध्याचे मुख्यमंत्री यांनी उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि संगमनेरमध्ये गद्दारीला माफी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री येथे येणार नव्हते. हे सर्वश्रूत होते. कोणताही शासकीय अधिकृत दौरा नव्हता. मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व आता शिवसेना (शिंदे गट) असा राजकीय पक्ष प्रवेश करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराने मुख्यमंत्री येणार अशी खोटी जाहिरात केली.
सभेसाठी संगमनेर तालुक्याऐवजी बाहेरच्या तालुक्यातील तरुण बोलवले. श्रीकांत शिंदे सुद्धा येणार नव्हते. मात्र अशी ही बनवाबनवी करून तरुणांना यांनी फसवले. एक तर तुम्ही शिंदे सेनेचेही एकनिष्ठ नव्हते. तुम्ही भाजपशी एकनिष्ठ नव्हते. मूळ शिवसेना आणि भाजपवाले लांब आहेत.
फक्त लोणी विखेंच्या इशारावर नाचणारी भाजप आणि शिंदे सेना शहरात असून त्यांना कोणीही थारा देत नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराची मोठी पंचायत झाली असून मुख्यमंत्री आणि कोणीच पदाधिकारी संगमनेरमध्ये आले नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनी संताप व्यक्त केला असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.
हे धंदे बंद करा…
एक तर तुम्ही अनेक पक्ष बदलले. खोटे बोलून आम्हाला संगमनेरमध्ये बोलवले. मुख्यमंत्री आले नाही. आम्हाला ताटकळत ठेवले. प्यायला पाणी नाही. आता हे धंदे बंद करा, असा संताप ग्रामीण भागातील तरुणांनी महायुतीचे उमेदवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर व्यक्त केला आहे.


