महाराष्ट्र संवाद न्यूज – कराड
विधानसभेत आम्हाला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठे लढाई होणार नसली तरी लोकांचे प्रश्न पत्रकार परिषद आणि बैठकांच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राज्यात महायुती सरकारला स्पष्ट जनादेश मिळाला – तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते पद मिळेल एवढी आमदार संख्या देखील महाविकास आघाडीतील एकही पक्षाला मिळालेली नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या एक दशांश सदस्य असणे आवश्यक असते. त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेते पदासाठी २९ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक असून ते कोणत्याच पक्षाकडे नाही. महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे १० सदस्यांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ ४६ एवढे होत असले तरी कोणत्याही एका पक्षाकडे २९ सदस्यांचे संख्याबळ नसल्याने यावेळी विरोधी पक्षनेतेपद नसेल, अशी स्थिती उद्भवली आहे. 
विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे – विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेमध्ये २०१४ आणि २०१९ मध्ये असाच प्रसंग उद्भवला होता. यूपीएकडे आवश्यक संख्या वर असताना देखील कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हेच सूत्र विधानसभेत महायुती सरकारकडून कायम ठेवले जाईल अशी चिन्हे आहेत.
शरद पवारांशी झालेल्या भेटीवर भाष्य – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कराड येथे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली. उद्याची रणनीती तात्काळ ठरविता येणार नाही. आम्ही आमच्या नेतृत्वाला विनंती केली आहे की दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घ्या आणि तळागाळात काय मत आहे हे जाणून घ्या, असं सांगितलं आहे.

