विशेष प्रतिनिधी | मुंबई
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या त्यानुषंगाने महाविकास आघाडीच्या झालेल्या दारुण पराभवाची नौतिक जबाबदारी घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेस श्रेष्ठीनी फेटाळून लावला आहे. निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर आता नाना पटोलेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र याला भाजपची बदमाशी कारण असल्याचं सांगत पटोलेंचा राजीनामा फेटाळण्यात आला.
पटोले दिल्लीला – राज्यात एकीकडे सत्तास्थापनेची गडबड सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यानंतर नाना पटोले हे दिल्लीला रवाना झाले.
राजीनामा – त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतली. या भेटीत नाना पटोले यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांचा राजीनामा काँग्रेसच्या हायकमांडने न स्वीकारल्याने नाना पटोले हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. 
हायकमांडचा निर्णय – आता काँग्रेस हायकमांडकडून नाना पटोले यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ही राजीनामा देण्याची वेळ नाही. हा फक्त प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा नाही. हा निवडणुकीत झालेल्या हेराफेरीचाही मुद्दा आहे. त्यामुळे आता तुम्ही राजीनामा देऊन मीडियासमोर चुकीचा नरेटिव्ह सेट करु नका, असं नाना पटोले यांना बजावण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्षपदावर कायम राहा. विधानसभेच्या पराभवाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस हायकमांडने सांगितलं आहे.
प्रदेशाध्यक्षपदावर कायम – काँग्रेसच्या मीडिया सेलने नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याचं वृत्त फेटाळून लावलं होतं. ‘नाना पटोलेंनी राजीनामा दिलेला नाही. यासंदर्भातल्या बातम्या असत्य असून त्या खोडसाळपणे पसरवल्या जात आहेत’, असं काँग्रेसच्या मिडिया सेलकडून सांगण्यात आले होते. त्यातच आता काँग्रेस हायकमांडने दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय होईपर्यंत नाना पटोले हेच प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार आहेत.

