विशेष- ॲड. गोरक्ष कापकर
लोकसभाच्या निवडणूकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांतील नेते भाजपवर तुटून पडले, जातीय धुर्वीकरणांचा झालेल्या फायद्याचा गैरफायदा घेऊन देवेंद्र फडणवीस हे पराभवाला दोषी आहे हे दाखविण्यासाठी तथाकथित पत्रकार, सर्व राजकीय विरोधक नेत्यांनी प्रयत्न केला. भाजपा पक्षाचा डोलारा ज्या सेनापतीवर आधारित होता, त्याला बदनाम करण्यासाठी खास षड्यंत्र रचले जाऊ लागले. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीत लाखो ग्रुप खोलून त्यावर खलनायकाचे भूमिकेत उभे करून एकटे पाडण्याची प्रयत्न केला, त्यांच्या जातीवर, त्यांच्या संख्येवर बोलण्याचा प्रयत्न आला. एक स्थितप्रज्ञ व्यक्ती सारं काही सहन करून फक्त कामावर लक्ष केंद्रित करत होती. महाराष्ट्रभर ८० वर्षीय चाणक्याच्या गप्पा मारल्या जाऊ लागल्या. त्याचे चाहते वाटेल त्या पद्धतीने समाज माध्यमावर फडणवीस तर कधी त्याच्या कुटुंबीयांना ट्रोल करत होती. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवाचे खापर एकट्या फडणवीस यांच्यावर फोडण्यासाठी मीडियातुन प्रयत्न केले जाऊ लागले. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून संपवण्यासाठी येन केन मार्गाने प्रयत्न केले जाऊ लागले. खरंतर यशाचे श्रेय घेण्यासाठी हजारो पुढे येतात, परंतु अपयश एकट्याला पदरात घ्यावे लागते आणि ते स्वीकारण्याच धाडससुद्धा पाहिजे. अशा परिस्थितीत अपयशाची जबाबदारी त्याने निर्भीडपणे पत्रकार परिषद येऊन स्वीकारली, उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त होऊन पक्ष संघटनेसाठी लढण्याची तयारी दाखवली.
खरंतर कुणी कोणत्या जातीत जन्माला यावं हे जन्म घेणाऱ्याच्या हातात नसतं, असं असताना सुद्धा त्याला महत्व न देता आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण प्रश्न सोडवत सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेत आपली विकासाची लढाई त्यांनी चालू ठेवली. खरंतर महाराष्ट्रमध्ये महायुतीचे २०२१- २०२२ सालात सरकार आणताना त्यांचा सिंहाचा वाटा असताना मुख्यमंत्रीपदाची खुर्चीचे खरे मानकरी स्वतः असताना सोबत आलेल्या मित्राला खुर्ची देऊन मोठे करण्याचे काम करणारे दिलदार आणि राजकारणातील अजात शत्रू व्यक्तिमत्व देवेंद्र फडणवीस हेच आहे. २०२४ सालची लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न लढता जातीच्या मुद्द्यावर लढली गेली. शंभर वर्षांमध्ये कधी न पाहिलेला इतका जातीवाद, लोकांमध्ये व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टासारख्या समाज माध्यमातून विषासारखा पेरला जाऊ लागला. या साऱ्या परिस्थितीला तोंड देत तो एकटा पहाडासारखा उभा होता. त्यांच्या जातीला, त्याच्या समाजाला नाव ठेवू लागली होती. असे असताना ३ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका, त्यात लोकसभेत झालेली मोठी पडझड, मित्रपक्षावर लोकांची असलेली नाराजी, हया साऱ्या संकटातून जात असताना एकटा माणूस स्थितप्रज्ञ होऊन टीका, टिप्पणी झेलत होता, पाकीट मिळालेले पत्रकार, विरोधक जाणीवपूर्वक त्याला एकट्याला दोषी ठरवत होते.
लोकसभेतील अन अपेक्षित यशाने भुरळवून गेलेल्या विरोधी पक्षातील नेत्यांत एकच चर्चा चालू होती. अकेला देवेंद्र करेंगा क्या ? शेवटी विधानसभा निवडणुकीत कामावर निष्ठा, सहशीलता, दृढनिश्चय, प्रामाणिकपणा हया संघाच्या शिकवणीतुन २८८ विधानसभा जागेपैकी २३४ जागेवर निर्विवाद वर्चस्व मिळवत ढासळलेल्या इमारतीचा खांब म्हणून उभे राहत पुन्हा सत्तेत आणून दाखवले. या लढाऊ योध्याचा खरंतर कार्यकर्ता ते नेता हा प्रवास सोपा नव्हता. कमी वयात नगरसेवक, नागपूर महानगराचे महापौर, आमदार, भाजपा युवा प्रदेश अध्यक्ष ते विधानसभेत विरोधी पक्ष नेता अशा अनेक जबाबदाऱ्या खंबीरपणे त्याने अनेक अडथळे दूर करत पार पाडल्या.
२०१३ सालं खरंतर महत्वाचे ठरले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर महाराष्ट्र भाजपात वेगळी ओळख निर्माण करणारे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व तयार झाले. १८ पगडजाती जमाती, बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणारा शिलेदार, बहुजन समाजाचा नायक म्हणून त्यांची वेगळी ओळख महाराष्ट्राला नाहीतर देशाला झाली .
डावाला प्रतिडाव, प्रश्नाला उत्तर तयार ठेवणारा अभ्यासू नेता म्हणून ओळख तयार केली. लोकसभा निवडणुकीनंतर मला फक्त तीन महिने दया, असे म्हणून तीन महिन्यात महायुतीला यशाच्या शिखरावर पोहोचवणारे ते नेतृत्व ठरले. खरंतर महाराष्ट्रमध्ये स्वतःलाच राजकारणातील चाणक्य म्हणणारे अनेक जण व त्यांचे पाठीराखे असतील. परंतु महाराष्ट्राच्या मातीमध्ये जनसामान्य लोकांना हाताशी घेऊन विकासाच्या मुद्द्यावर १०० पेक्षा जास्त एका पक्षाचे उमेदवार सलग तिसऱ्यांदा निवडून आणणारा अजून तरी फडणवीसांना जोड असलेला पैलवान पैदा झालेला नाही. मी-मी म्हणणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक चाणक्यांच्या “चाणक्य” करणारा, पाठीला माती मातीच नाही, प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानावर लोळून माती चारणार एकमेव मैदानातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस ठरले आहे.
अशा कठोर, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय,कुशल शासक असलेल्या लोकप्रिय नेत्याला पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री नेमून महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली, निश्चितच या संधीचा फायदा घेऊन ते महाराष्ट्राला कायम पहिल्या क्रमांकावर ठेवतील यात कोणतीही शंका नाही इतकेच.
(लेखक विधीज्ञ असून भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे पदाधिकारी आहे. लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी ९९२१३८६९८४) 

