विशेष प्रतिनिधी / मुंबई
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा पेटला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावात याही वर्षी महाअधिवेशनाचे आयोजन केले होते. मात्र, कर्नाटक सरकारने त्यावर बंदी घातली असून एकीकरण समितीच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत बेळगाव-कारवारला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. 
यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर ताशेरेही ओढले. आदित्य ठाकरे म्हणाले की, आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं की, बेळगावला केंद्रशासित करण्यासाठी आजच्या अधिवेशनात ठराव आणा आणि तो केंद्राकडे पाठवा. हा ठराव आज आला असता तर आम्ही तो एकमताने मंजूर करण्यासाठी मदत केली असती. हा ठराव महत्त्वाचा असून महाराष्ट्रातील आणि बेळगावातील मराठी जनता याकडे पाहत आहे. तिकडचे स्थानिक लोक हे हिंदू आहे. अशावेळी काही लोक आपल्याकडे येऊन आपल्याला बटेंगे तो कटेंगे वगैरे सांगतात, हे लोक बेळगावातील प्रश्नावेळी जातात कुठे? त्याच्यावरील अत्याचार आपण का सहन करत आहोत? याचं उत्तर भाजपाने देणं गरजेचं आहे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
बेळगावप्रश्नी शिवसेना ठाकरे गटाच्या काही नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली असून अटक करण्यात आली आहे. या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, नोटीस पाठवण्यात आली असून अटकही करण्यात आली आहे, तसेच स्थानिक जनतेवर यापुढे लाठीचार्जही होऊ शकतो. हे प्रकरण कुठेही न चिघळता, केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावं आणि मोदींनी तिथे केंद्रशासित राज्य जाहीर करावं, असं आवाहन ठाकरेंनी केलं. 
याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, यापूर्वी शिवसेनेचे नेते बेळगावात पोहचले होते आणि तिथे जाऊन कार्यक्रम केला होता. त्यामुळे आता पुन्हा गरज भासल्यास जाणार का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, जर आम्ही आताच सांगितलं तर आमचे अडवणूक करण्यात येईल. उदय सामंत आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार आहेत. या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी ते लोक तिथे जाऊन करणार काय? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की, दोन्ही नेत्याचं या ठिकाणी सरकार आहे. केंद्रात त्यांच सरकार आहे. तसेच बेळगावात त्यांच्या मित्रपक्षाचं सरकार आहे. अशावेळी त्यांनी बेळगावाला केंद्रशासित प्रदेश करण्याचा ठराव मंजूर करून केंद्रात पाठवायला हवा होता.
केंद्रात लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत बेळगावला केंद्रशासित प्रदेश करा. पण कुठेतरी हे सर्व थांबणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी स्वत: जाऊन वातावरण अजून चिघळवण्यात काहीच अर्थ नाहीय. तिथे जाऊन तुम्ही नक्की काय करणार आहात? खोटी आश्वासन आम्ही मागच्या वर्षीही पाहिली आणि यावर्षीही पाहत आहोत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

