बुधवार, ११ डिसेंबर
संगमनेर – संगमनेर नगर परिषदेच्या सहकार्याने शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेने सुरू केलेले वाँटर एटीएम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नागरिकांना खाजगी पाणी पुरवठा करणार्या व्यक्तीकडून पाणी घ्यावे लागत आहे. पालिकेची शुद्ध पुरवठा योजना ठेकेदाराला फायदेशीर ठरली आहे 
संगमनेर नगर परिषदेच्यावतीने दररोज शहरातील उपनगरात नळाव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे. निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन टाकुन कायम स्वरूपी हा प्रश्न मार्गी लावला आहे. पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे यासाठी प्रवरा नदीजवळ साई मंदिर परिसरात जल शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. तरीही नगर परिषदेने दहा वर्षांपूर्वी नाशिक येथील ‘प्रथमेश एन्टरप्रायजेस’ या संस्थेला शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यास टेंडर दिले. बाजार समितीच्या आवारात असलेल्या नगर परिषदेच्या जनतानगर येथील जलकुंभाच्या जागेत खाजगी आरो प्लांट उभा करण्यात आला आहे. तेथून चारचाकी वाहनातून शहरात उपनगरात वाँटर एटीएममधुन पाणी विकले जाते होते. तर नागरिकांना मोक्याच्या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नविन नगर रस्ता, अकोले नाका, गणेश नगर, नेहरू चौक आदिसह इतर महत्त्वाच्या जागी वाँटर एटीएम स्टँड उभारण्यात आले. तेथे पाण्याच्या टाकीत चारचाकी वाहनातून पाणी पुरवठा केला जात होता. तेथून नागरिक नाणे टाकुन पाणी विकत घेत होते. 
गेल्या अनेक महिन्यांपासून हे सर्व वाँटर एटीएम स्टँड बंद आहे. तर गणेशनगर येथील वाँटर एटीएम एका बिल्डरने काढून टाकले आहे. चार चाकी वाहनेही बंद करण्यात आली आहे. जनतानगर येथील एकच आरो प्लांट सध्या सुरू आहे. पाणी विकुन नेमकी किती कमाई झाली. पुढे हे वाँटर एटीएम, वाहने का बंद करण्यात आली याबाबत पालिकेकडे माहितीच उपलब्ध नाही. मुदत संपूनही सदर प्रथमेश एन्टरप्रायजेसचे काम सुरू असून पालिकेची फसवणूक केली जात असल्याची माहिती एका माजी नगरसेवकाने दिली. 
पालिकेचेही या प्रकरणाकडे दुर्लक्ष झाले असून शहरात नागरिक, भाजी विक्रेते, फेरीवाले, दुकानदार यांना या वाँटर एटीएमचा आधार होता. आता खाजगी पाणी विक्रेते या सर्वाचा फायदा घेत असून पाण्याचे जार विकले जात आहे. पालिकेत सध्या प्रशासक राज असून तीन वर्षे झाली तरी निवडणूका झाल्या नाही. यामुळे कारभार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात आहे. ते कुणाला दाद देत नाही. एकुणच खाजगी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेक करत आहे.
ठेकेदार फुकट वापरतोय पाणी…
संबंधित ठेकेदाराची मूदत संपली आहे. पालिकेचे पाणी वापरून पैसे कमविण्याचा उद्योग गेली अनेक वर्षे सुरू होता. सध्या सुरू असलेले जनतानगर येथील आरो प्लांट लबाडीने सुरू आहे. पालिकेचे पाणी वापरण्याच्या बदल्यात कुठलेच शुल्क ठेकेदार भरत नाही.
अँड. श्रीराम गणपुले, शहराध्यक्ष भाजपा.


