विशेष प्रतिनिधी /मुंबई
बुधवार ११ डिसेंबर – लाडक्या बहिणींमुळे महायुतीचं सरकार आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने सांगतात. पण, लाडक्या बहीण योजनेसाठी नव्या अटी आणि शर्ती लावण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक महिलांना वगळले जाऊ शकते. मात्र, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम महिलांना यातून वगळण्याची मागणी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
सर्वाधिक लाभार्थी मुस्लिम – मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण योजने’चे सगळ्यात जास्त लाभार्थी हे मुस्लीम समाजाचे आहेत. मात्र, दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यात येऊ नये, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. यामुळे खरेच दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना ‘लाडकी बहीण योजने’तून वगळण्यात येणार का? या चर्चेला तोंड फुटलं आहे.
नितेश राणे म्हणाले, “मुस्लीम कुटुंबाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचं सरकार नको आहे. पण, अन्यवेळी प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेताना मुस्लीम कुटुंबीय पुढे असतात. तुम्हाला तुमचा धर्म महत्त्वाचा असेल, तर सरकारी लाभ कशाला घेता? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वात जास्त लाभार्थी हे मुस्लीम समाजाचे आहेत.”
काय म्हणाले होते राणे – दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळावे, अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे. जेणेकरून पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवणाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं.

