गुरुवार १२ डिसेंबर
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीचे काही आमदार खासदार भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असून भाजपकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवले जाण्याची चिन्ह आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरल्याने महाविकास आघाडीतील आमदार, खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 
दरम्यान, महाविकास आघाडीतील कोणीही भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात नाही, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बावनकुळे यांचा दावा खोडून काढला आहे.
नाना पटोले यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हण यांनी देखील बावनकुळे आणि दरेकर यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील सरकार मजबूत असले तरी केंद्रातील सरकार मजबूत नाही. त्यांना काही खासदारांची गरज लागेल म्हणून ते अशाप्रकारचे प्रयत्न करत असतील. परंतु त्यांना यश मिळणार नाही. भाजपचे केंद्रातील सरकार चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या कुबड्यावर उभे असून त्या कुबड्या कधीही गळून पडतील या भीतीतून हे सर्व सुरू आहे.”
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे… “महाविकास आघाडीतील काही आमदार, खासदार अस्वस्थ आहेत. पक्षाचे आमच्याकडे दुर्लक्ष होत असून, पक्षाकडून पाठबळ मिळत नाही. मतदारसंघातील परिस्थितीविषयी बैठकांचे आयोजन केले जात नाही, असे मविआतील नाराज आमदार, खासदारांचे म्हणणे आहे. तपास यंत्रणा त्यांचे काम करत असतात. आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही. ईडी, सीबीआयचा वापर केला जातो, हे महाविकास आघाडीच्या लोकांचे नेहमीचे रडगाणे आहे. मात्र, मोदींनी केलेल्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमच्या पक्षात कोणी आले तर, त्यांचे स्वागत आहे.”
प्रवीण दरेकर म्हणाले… “मविआतील आमदार-खासदार पुढील राजकीय भवितव्याचा विचार करत हालचाली करत आहेत. केंद्रात भाजप युतीचे आणि राज्यात भाजप महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह, विकास या मुद्द्यावर शरद पवारांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमच्यासोबत येण्याचा विचार करू शकतील.”

