रविवार, १५ डिसेंबर
संगमनेर – परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करत अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर होऊन देखील त्याचा मृत्यू कोठडीत झाल्याने पोलिसांनी त्याचा खून केल्याचा दलित समाजातील कार्यकर्त्यांचा समज झाला असल्याने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून संगमनेर बंदचेही आवाहन करण्यात आले आहे.
आरपीआयचे कैलास कासार, राम सुरळकर, बापू रणधीर, राम दारोळे, रवी दिवे, आशिष शेळके, विशाल वैराळ, वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई व्होरा आधी विविध संघटनांच्यावतीने प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, परभणी येथे पोलिसांनी दलित समाजातील कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर जे बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन केले त्यामध्ये अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणारा वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला कोर्टाने जामीन मंजूर करूनही त्याचा मृत्यू पोलीस कोठडीत झाला आहे. नव्हे तर त्याचा पोलिसांनी खून केला आहे, असा दलित कार्यकर्त्यांचा समज झाला आहे. यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील विविध संघटनांनी आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार संगमनेरमध्ये सोमवारी (१६ डिसेंबर) बंद पाळण्याचा निर्णय घेतला असून विविध संघटनातील कार्यकर्ते एकत्रित शहरात फिरून संगमनेर बंद करा म्हणून संगमनेरकरांना विनंती करतील. तसेच शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला सकाळी साडेनऊ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. संगमनेरकरांनी बंद शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहन विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

