लोणीत शोककळा! चंद्रपूर साठवण तलावात बुडून ३ ‘एमबीए’ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढले

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजचे काही विद्यार्थी चंद्रपूर परिसरातील साठवण तलावाजवळ फिरण्यासाठी गेले होते. त्या दरम्यान काही जण पाण्याच्या कडेला गेले असता, पाण्याचा आणि पाण्याच्या खाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक पाण्यात बुडू लागले. सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करून तातडीने मदतीसाठी हाक मारली. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, पाण्याची खोली जास्त असल्याने आणि वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक प्रशासनाच्या व नागरिकांच्या मदतीने मृतदेह तलावाबाहेर काढले व घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या साठवण तलाव परिसरात सुरक्षेच्या कोणत्याही पुरेशा उपाययोजना नसल्याची संतप्त चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. अशा धोकादायक आणि खोल पाण्याच्या ठिकाणी प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने फलक लावणे किंवा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करत आहेत.
