संगमनेरमधील विठ्ठल मंदिर परिसरात नियोजित समाधी भूमीपूजन कार्यक्रमाला शिष्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत आंदोलन छेडण्याचा इशारा
शिष्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाच्या वतीने वारसाहक्काबाबत मा. न्यायालयात आर.सी.एस. क्रमांक १६९/२०१५ अन्वये दावा दाखल करण्यात आलेला असून तो सध्या प्रलंबित आहे.


या संदर्भात मंडळाच्या वतीने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलनगर येथील विठ्ठल मंदिरात दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता दिवंगत ज्ञानेश्वर महाराज जाधव यांच्या समाधीचा भूमीपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे फलक (फ्लेक्स बोर्ड) मंदिराचे गेट तसेच गावात इतरत्र लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या फलकांवर हा कार्यक्रम ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाच्या वतीने आयोजित केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, शिष्य मंडळाने असा कोणताही कार्यक्रम आयोजित केला नसून, काही अज्ञात व्यक्तींनी मंडळाच्या नावाचा गैरवापर करून हे फ्लेक्स बोर्ड लावले आहेत आणि लोकांची दिशाभूल केली आहे, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून ३० मे रोजी हा अनधिकृत कार्यक्रम होऊ दिला, तर ह.भ.प. किसन महाराज हारदे शिष्य मंडळाचे सर्व प्रतिनिधी, विठ्ठल मंदिराचे भक्त आणि संगमनेरचे स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने एकत्र येतील. या कार्यक्रमाला लोकशाही मार्गाने आणि निषेध आंदोलनाच्या माध्यमातून कडाडून विरोध केला जाईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची आणि कायदा व सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

