
बीडच्या मस्साजोगचे सरपंच सुभाष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्राची लक्तरं गेल्या पंधरा दिवसांपासून सार्या देशभर निघत आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात असं होऊ शकतं, याची खात्रीच देशमुख यांच्या हत्येने देशाला करून दिली आहे. या प्रकरणातला तपास ज्या गतीने सुरू आहे ते पहाता महाराष्ट्राला वळणावर आणण्याच्या आणाभाका देणार्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य सावरता येईल, असं वाटत नाही. एका सरपंचाचा खून होतो, लोकं रस्त्यावर उतरतात, सरपंचांची लहान मुलगी न्यायासाठी सरकारकडे याचना करत असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून खुनी सापडत नाही, हे कसं शक्य आहे? एक काळ होता दाऊद आणि गवळी गँगने दिवसाढवळ्या खून खराबा करत मुंबईची अवस्था बिकट करून ठेवली होती. सरकारने मनावर घेतलं आणि या गँग उदध्वस्थ करून टाकल्या. हे जर घडू शकतं तर एका खुनाचा आरोपी पोलिसांना सापडू शकत नाही, यावर कोणाचाच विश्वास नाही. अशा घटना आपल्या वाट्याला यायला नको, आल्याच तर पोलीस आपल्याला न्याय देतील यावर आजकाल कोणाचाच भरवसा राहिलेला नाही.
बीडसारख्या जिल्ह्यात तर हे पराकोटीला गेल्याचं दिसत आहे. एका जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यात ३६ खून, १५६ बलात्काराच्या घटना घडूनही गृहखातं त्याची दखल घेणार नसेल तर लोकांचा विश्वास असाही राहणार कसा? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने या सार्यांवर कडी केली. ज्या विकृत पध्दतीने संतोष यांचा जीव घेण्यात आला त्याची व्याख्या ही अमानवी अशीच करावी लागेल. एखाद्या व्यक्तीवर राग असू शकतो, पण त्याचा बदला इतक्या क्रूरतेने घेतला जाऊ शकतो, हे या राज्याने प्रथमच पाहिलंय. ही क्रूरता पाहून राज्य हादरलं नसतं तर नवलच. जिथे एका सरपंचाचं आपण संरक्षण करू शकत नसू तर सामान्यांनी करायचं काय?
वाळू माफियांपासून खंडणीखोरांनी बीड जिल्ह्याचं मातेरं केलं आहे. भूखंड माफिया ते मोरांची हत्या करणार्यांची या जिल्ह्यात आजवर कमी नव्हती. आता माणसांची हत्या करण्यापर्यंत गुन्हेगार धजावले आहेत. पोलिसांनी आपलं कर्तव्य वेळीच पार पाडलं असतं तर सारं काही ठिकाणावर यायला वेळ लागला नसता. पण इतका प्रामाणिकपणा पोलिसांमध्ये शिल्लक असायला हवा ना?
देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणात ज्याचं नाव घेतलं जातं त्या वाल्मिक कराड याला अटक झाली नाहीच उलट जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाची बदली झाली. दुसरे आले तरी वाल्मिक सापडेना, यावरून गृहखात्याहून वाल्मिक कसा शिरजोर आहे, हे लक्षात येतं. वाल्मिकीचा हा प्रवास गोपीनाथराव मुंडेंपासूनचा. पंकजा लहान असताना गोपीनाथरावांचे जिल्ह्यातील सारे व्यवहार वाल्मिकीच सांभाळायचा. कधी तर त्याला अनेक पत्रकारांनी गोपीनाथरावांच्या मंत्रालयातल्या कार्यालयात पीएगिरी करतानाही पाहिलेलं. आपल्या या शक्तीआड कोणी आलं की त्याला मांजरसुंब्याचा घाट दाखवायचा. असं हे चलचक्र गेली अनेक वर्ष सुरू आहे. 
यातूनच एकमेका वरचढ झालेल्या किशोर फड, संगीत दिघोळे, बंडू मुंडे, महादेव मुंडे यांच्या हत्या झाल्या. पुढे यातल्या शिरजोर झालेल्या काका गर्जेलाही संपवण्यात आलं. ही प्रकरणं बाहेर आल्यावर लाज निघू लागली तसं हवेत गोळीबार करणार्या कैलास फडला अटक करण्यात आली. हा कैलास धनंजय मुंडेंचाच राईटहॅण्ड निघाला. दिवाळीच्या शस्त्र पूजनावेळी हवेत गोळीबार केला म्हणून कैलासला अटक होत असेल तर धनंजय यांनी केलेल्या हवेतील गोळीबाराचं स्पष्टीकरण पोलीस का देत नाहीत? या मुंडेंचं गोळीबार करतानाचं छायाचित्र तर अंजली दमानिया यांनी बीडमध्ये जाऊन प्रसार माध्यमांना दिलं आहे.
ज्या वाल्मिकीवर देशमुखांच्या हत्येचा आरोप झाला आहे. त्या वाल्मिकीचा प्रवास भलताच रंगेल आहे. बीडचे माजी जिल्हाधिकारी सदानंद केचे यांनी लिहिलेल्या पुस्तकातील बारकावे पाहिले की आज ज्याला आपण बीड संबोधतो तो जिल्हा बिहारमधील माफियाराजहून कमी नाही, हे स्पष्ट दिसतं. आयपीएस आणि आयएएस अधिकार्यांची राज्यातील भाऊगर्दी पाहाता बीडमध्ये कारभार पाहणार्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही यूपी, बिहारमधील मंडळींची होती. जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची वाट लागेन अशी ही मनोवृत्ती होय. जी सर्वत्र फोफावू लागली आहे. माणुसकीचा कडेलोट तेव्हा सुरू झाला जेव्हा अपघातातील व्यक्तीला वाचवता वाचवता तिला तिची जात विचारली जाऊ लागली. ती आपल्या जातीतील नसेल तर तिला आहे त्या स्थितीत टाकण्याच्या वृत्तीने बीडचा जातीयवाद कोणत्या थराचा आहे, हे लक्षात आलं. 
गोपीनाथ मुंडे हे युती सरकारमधील सर्वात बलवान नेते असताना वाल्मिकीची बरीच चाले. तेव्हा पंकजा लहान होत्या. धनंजय यांचं नुकतंच राजकारणात येणं झालं होतं. तेव्हा पंडितअण्णा वाल्मिकीच्या जोडीने बीड जिल्हा परिषदेतील कारभार हाकायचे. यामुळे जिल्हाभर त्याची ताकद वाढत होती. यातून कामं देणं आणि त्यातून मलिदा लाटणं हे उद्योग आपसुकच आले. आसपासच्या नद्यांमधील वाळूची तस्करी, उभ्या डोंगरांचं उत्खनन यामुळे नद्या आणि डोंगरांचं बोडकंपण सहज नजरेत येतं. जिल्हा परिषदेला हाताच्या बोटावर नाचवणार्या या मंडळींचे हे सहज उद्योग होते. राष्ट्रवादीत असलेल्या सुरेश धस यांच्याशी या मंडळींचा पंगा वाढू लागला.
यातूनच २००० साली गोपीनाथ मुंडेंनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू केलं. धस यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी बळकावलेल्या देवस्थान जमिनी सोडवण्याचं निमित्त मुंडेंच्या उपोषणामागे होतं. बीडच्या राजकारणातील मुंडेंचं महत्व लक्षात घेऊन धसही भाजपवासी झाले. मात्र सत्तेच्या राजकारणात मुंडे आपल्याला मागे लोटत असल्यांचं लक्षात आल्यावर ते गोपीनाथ मुंडेंवर नाराज झाले. पंकजा याही एव्हाना जाणत्या झाल्या होत्या. त्यांना आमदार करण्याच्या मुंडेंच्या मनसुब्यांनी आगीत तेल ओतलं. धस यांच्याबरोबरच धनंजय आणि त्यांचे पिता पंडितअण्णा नाराज झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धस यांना पाटोदा, शिरूर आणि आष्टी या मतदारसंघातून एबी फॉर्म द्यायलाही नकार दर्शवण्यात आला. अति होऊ लागल्याने अखेर गोपीनाथरावांची साथ सोडून पंडितअण्णा यांनी भाजपला रामराम ठोकला. तेव्हा धनंजय मुंडे यांचा जिल्ह्यात जम बसत होता. यातच शरद पवार यांनी साथ दिल्यावर बीड जिल्हा परिषदेत सर्वात मोठी दुफळी पडली. ही जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली. याचं फळ म्हणून मग राष्ट्रवादीत गेलेल्या धनंजय मुंडे यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली. धनंजयहून राजकारणाची चार पुस्तकं चाळणार्या धस यांचा इगो दुखावला. त्यांनी राष्ट्रवादी सोडली आणि ते पुन्हा भाजपवासी झाले. तिथे विधान परिषदेचे आमदार झाल्यावर या दोन नेत्यांमधील कलगीदुरा सार्यांनाच पाहायला मिळायचा.
गोपीनाथ मुंडे यांचं अकाली निधन झाल्यावर संधी साधून वाल्मिकी याने धनंजय यांची पाठराखण केली. बीडमध्ये वाल्मिकी आणि मंत्रालयात धनंजय असं समीकरण बनलं. बीडमधल्या या वाढत्या ताकदीचा एक भाग म्हणून आवादा प्रा. लि. नावाच्या पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकार्यांकडून खंडणी मागण्यात आली. प्रकल्प उभारणीत मोलाचं सहकार्य करणार्या संतोष देशमुख यांना हे योग्य वाटलं नाही. तिथे गेलेल्या संतोष यांनी खंडणीखोरांना पिटाळून लावलं एक-दोघांच्या मुस्कटातही लगावली. शुक्रवारच्या रात्री तिथे येऊन मारहाण करणार्या प्रतिक घुले, सुदर्शन घुले आणि इतर पाच जणांविरोधात ड्युटीवरील वॉचमनने तक्रार केली. मात्र ती घ्यायला पोलिसांनी नकार दिला. भोसले नावाचे पीएसआय सुदर्शनला मोटार सायकलवरून रेकी करत होते. प्रकरण मिटवायचं म्हणून सरपंच संतोष केजला गेले आणि घात झाला. हे प्रकरण सभागृहात स्वत: धस सांगत होते तेव्हा सर्वांच्याच चेहर्यावर बीडची काळजी दिसत होती. आणि तेव्हा धनंजय मुंडे सभागृहाबाहेर होते. धनंजय मुंडें यांच्यावर आरोप करणारे अनेक अभिनेत्रींची नावं घेऊ लागले आहेत. त्यांच्यावर करोडो रुपयांच्या बोलीने बीडच्या संस्कृतीला काळीमा फासला आहे. लक्तरं तर निघाली आहेतच. पण त्यातूनही महाराष्ट्र सरकार काही बोध घेणार नसेल तर काळ सरकारला माफ करणार नाही.
(लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी – ८१६९१३५२५३)

