मंगळवार, ३१ डिसेंबर
वाल्मीक कराड मंगळवारी पुणे पोलिसांना शरण आला आहे. या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण विधान केले असून दहशत कायमची संपली तरच न्याय झाला असे म्हणता येईल, अन्यथा ही शरणागती तपासाची नौटंकी ठरेल असे म्हटले आहे.
खंडणी प्रकरणातील आरोपी आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आज अखेर सीआयडीकडे शरण आला आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील २२ दिवसांपासून कराड हा फरार होता.
वाल्मिक कराडसह सरपंच हत्या प्रकरणातील इतर फरार तीन आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चानंतर सरकारवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सीआयकडून वेगवान तपास सुरू होता. अशातच आज कराड स्वत:हून सीआयडी कार्यालयात हजर झाला.
दरम्यान या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, वाल्मीक कराड वाल्मीक कराड आज पुणे पुणे येथे पोलिसांना शरण आला आहे. तब्बल २२ दिवस तो पोलिसांना सापडत नव्हता हेच संशयास्पद आहे, पोलीस खात्याने पाठीचा कणा दाखवून बीडसह महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुंडगिरीचा बंदोबस्त करायला हवा. दहशत कायमची संपली तरच न्याय झाला असे म्हणता येईल, अन्यथा ही शरणागती तपासाची नौटंकी ठरेल, असे म्हटले आहे.


