बुधवार, ०१ डिसेंबर २०२५
संगमनेर – पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांची भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भेट देत शहरातील विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. भाजपाच्या या मागण्याप्रश्नी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. कायदा व सुव्यवस्था, चोऱ्या, पोलीस नावाचा बेकायदेशीर वापर, रिक्षा थांबे, अनावश्यक बॅरिकेटिंग आदी प्रश्नांचा यात समावेश आहे.
शहरातील व्यावसायिक कासट बंधूंना झालेली मारहाण यामुळे संगमनेर मध्ये कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात पोलीस तपासाबाबत पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपअधीक्षकांशी चर्चा केली. तात्काळ गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
शहर आणि तालुक्याच्या अनेक भागात खाजगी वाहनांवर ‘पोलीस’ असा फलक लावून वाहने फिरत असतात. गाडीच्या दर्शनी भागात कोणालाही दिसेल अशा पद्धतीने पोलीस कॅप ठेवलेली असते. अशी वाहने रस्त्यात वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने कोठेही उभी केलेली असतात. या वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे देखील पालन होत नाही. पोलिसांच्या अधिकृत वाहनाशिवाय खाजगी वाहनावर अशा प्रकारे पोलीस नावाच्या पाट्या लावणे बेकायदेशीर आहे. अशा पाट्या लावून गुन्हेगारी वृत्तीचे लोक गुन्हे करू शकतात.
अशा वाहनचालकांकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून सामान्य नागरिकांना धमकावण्याचे प्रकार देखील होतात. अशा बेकायदेशीर पोलीस नावाचा वापर करणाऱ्या वाहन चालक-मालकांवर कारवाई करण्यात यावी.
संगमनेर परिसरात तसेच बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरी, दागिने चोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून दागिने चोरांचा शोध घेत चोऱ्यांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बस स्थानकाजवळ काश्मीर हॉटेल समोरील रस्ता बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अकोले कडून येणाऱ्या वाहनचालकांना शासकीय विश्रामगृहाजवळून वाहने वळविण्याची कसरत करावी लागते. यामुळे तेथे देखील वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी बॅरिकेट टाकण्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसत नाही. पोलीस प्रशासनाने बॅरिकेट टाकण्याऐवजी येथे असलेला रिक्षा थांबा हटवावा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी. शिवाय येथील सिग्नल यंत्रणा सुरू केल्यास या परिसरात वाहतुकीला शिस्त लागू शकते.
संध्याकाळी अंधार पडल्यानंतर जाणता राजा मैदान परिसरात दारुड्यांचे साम्राज्य असते. त्यांच्या वागणुकीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमध्ये देखील दारुड्यांच्या उपद्रवामुळे भीतीचे वातावरण असते. येथे सायंकाळ नंतर पोलिसांची गस्त सुरू केल्यास या दारुड्यांचा बंदोबस्त होऊ शकतो, असे देखील निवेदनात म्हटले आहे. तरी पोलीस उपअधीक्षकांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये राम जाजू, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमानी, दिलीप रावळ, भरत ढोरे, कल्पेश पोगुल, जगन्नाथ शिंदे, भगवान कुक्कर, सुशील शेवाळे, पांडुरंग शेरॉल, कांचन ढोरे, ज्योती भोर, रेश्मा खांडरे, पायल ताजणे, अरुणा पवार आदींचा समावेश होता.

पोलीस उपअधीक्षकांची भेट घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी वेधले समस्यांकडे लक्ष
पोलीस उपअधीक्षकांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

