मनमोहन सिंग यांना शोकसभेतून अभिवादन
स्वच्छ चारित्र्य असलेल्या मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण – डॉ. तांबे
गुरुवार, ०२ जानेवारी
संगमनेर – खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
मालपाणी लॉन्स येथे भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड, रणजीतसिंह देशमुख, युवक काँग्रेस अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हिरालाल पगडाल आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गोरगरीब माणसाला केंद्रबिंदू मानून यूपीए सरकारच्या काळात अन्नसुरक्षा कायदा, आरोग्याच्या विविध योजना, माहितीचा अधिकार, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, महिला व बालकांसाठी आरोग्य सुविधा असे अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. डॉ. सिंग कल्याणकारी धोरण राबविणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ होते. त्यांनी देशाच्या आर्थिक क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप बदलण्यास मोठी मदत झाली.
देशाचा अर्थमंत्री म्हणून कारभार पाहताना खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. लायसन्स राज संपवून त्यांनी उद्योग व्यवसाय वाढीला चालना दिली. यामुळे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज सह जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांनी आपल्या देशात मोठी गुंतवणूक केली. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.
२००४ मध्ये पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारत त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. महाराष्ट्रातील रोजगार हमीचा कायदा त्यांनी देशपातळीवर राबविला. मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनी यूपीए सरकारच्या काळात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णय यांचे जागतिक पातळीवर कौतुक देखील झाले.
मी कृषिमंत्री असताना व विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना २००८ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केल्याची आठवण सांगत शेतकऱ्यांशी अत्यंत तळमळीने संवाद साधणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा साधेपणा, स्वच्छ चरित्र, निगर्वीपणा हा देशवासीयांच्या कायम स्मरणात राहणारा असल्याचे थोरात म्हणाले.
यावेळी हिरालाल पगडाल, बाळासाहेब गायकवाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर व तालुका काँग्रेस, महाविकास आघाडी, पुरोगामी संघटना आणि अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



