विशेष प्रतिनिधी | मुंबई
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ ला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या वाल्मीक कराड याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. ही मागणी केवळ विरोधातील नेतेमंडळी किंवा आमदारांकडून होत आहे असे नाही तर महायुतीतील काही त्यांच्या सहकाऱ्यांकडून देखील होत आहे.
या मागणी संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांनी उलट प्रश्न केला आहे. मुंडे गुरुवारी (०२ जानेवारी) राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसार माध्यमांनी मुंडे यांना घेरले. विरोधकांकडून आणि त्यांच्याच काही सहकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या राजीनाम्या बाबतच्या मागणीचे विचारणा केली असता यावर उत्तर देताना मंत्रिमंडळ म्हणाले की, मी राजीनामा द्यावा, तर तो का द्यावा? याचे काहीतरी कारण लागेल ना? असा उलट प्रश्न केला.
तर, या प्रकरणात ना मी आरोपी आहे, ना माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध आहे. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा, अशा पद्धतीने माझा राजीनामा मागण्यात येत आहे. पण यामुळे राजीनामा मागणाऱ्यांचे समाधान होत असेल तर ठीक आहे, असा टोला त्यांनी राजीनामा मागणाऱ्या त्यांच्या विरोधकांना लगावला आहे.
मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटर होईल, त्यामुळे छोट्या आकाला वाचविण्याची गरज आहे, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. या विधानाला प्रत्युत्तर देत मुंडे म्हणाले की, विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत. पण अशा पद्धतीने छोटा आका, मोठा आका ही भाषा पहिल्यांदाच ऐकत आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सीआयडी व्यवस्थित तपास करत आहेत.
आमच्या दृष्टीने संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे आणि ज्यांनी ही हत्या केली आहे, त्यांच्याबाबतचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फासावर चढवणं हा सर्वात प्रथम आमचा उद्देश आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं किंवा या प्रकरणात कोणाचे काय होणार याला काहीही अर्थ नाही. मुळामध्ये या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला गेला पाहिजे, ही भूमिका मांडत सर्वात प्रथम हिवाळी अधिवेशनात याची मागणी मी केली होती, असं मुंडे म्हणाले.
या प्रकरणातील जे आरोपी फरार आहेत, त्यांना लगचेच अटक करून त्यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, हीच माझी भूमिका असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं. तर, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मुंडेंचा तपासावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावर मुंडे म्हणाले की, या तपासावर मंत्री म्हणून कोणताही प्रभाव माझा होऊ शकत नाही. सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन तपास होणार आहे. त्यामुळे मंत्री म्हणून कोणताही प्रभाव होणार नसल्याचा दावा त्यांनी केला. 

