विशेष प्रतिनिधी / मुंबई
देशातील सार्वत्रिक आणि विविध राज्यांच्या मतदानात विरोधकांनी ईव्हीएमवर घेतलेला आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निकालात काढला. जागतिक किर्तीचे तज्ज्ञ एलन मस्क यांनी केलेला ईव्हीएम हॅकिंगचा दावा मोडीत काढताना ज्या देशात ईव्हीएम वापरले जात नाहीत त्या देशातील लोकंच ईव्हीएमला दोष देत असल्याचा दावा कुमार यांनी केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले. मात्र, राजीव कुमार यांच्या या भूमिकेवरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विरोधकांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. ईव्हीएम कोणत्याही प्रकारे हॅक होऊ शकत नाही, या आपल्या बोलण्याचा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पुनरुच्चार केला. तसेच हे सांगताना अमेरिकन अब्जाधीश एलन मस्क यांच्यावरही टीका केली.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचा आरोप हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी केले होते. त्याला उत्तर देताना आयुक्त राजीव कुमार म्हणाले, ईव्हीएमबाबत अविश्वसनीयता तसेच कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस किंवा बग तसेच, अवैध मतांचा प्रश्नच उद्भवत नाही. यामध्ये काही गडबड होणे शक्य नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सातत्याने वेगवेगळ्या निर्णयांत हेच सांगत आहेत आणि आता याहून अधिक काय सांगता येईल? ईव्हीएममधील गडबडीचे आरोप निराधार आहेत, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
राजीव यांचा दावा नवी दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांनी स्पष्टपणे फेटाळून लावला. राजीव कुमार यांच्या या दाव्याशी आपण अजिबात सहमत नाही. ईव्हीएममध्ये गडबड होऊ शकत नाही, असे निवडणूक आयोग हे कसे म्हणू शकते? पूर्वीही गडबड व्हायची. आता बनावट पद्धतीने मतदान केले जाऊ शकते; त्यामुळे गडबड होत नाही, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अशा स्थितीत निवडणूक आयोगाने त्यांच्या शंकांचे निरसन करायला हवे. जर त्यांना सर्व काही योग्य वाटत असेल आणि त्यांची प्रक्रिया इतकी पारदर्शक असेल तर लोकांना शंका का येत आहेत, हा देखील एक प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.


