महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढत असून, येत्या काही दिवसांत हा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि प्रख्यात कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दुपारच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला आहे.
यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असून अहिल्यानगर जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचे सावट असून, संगमनेर परिसरातही ही तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लोकांची ये-जा वाढली आहे. अशा वेळी अनेक युवक कडक उन्हात डोक्यावर कोणतीही टोपी किंवा रुमाल न घेता फिरताना दिसतात. हा अतिआत्मविश्वास आरोग्यासाठी घातक ठरू शकतो आणि यामुळे उष्माघाताचा (सनस्ट्रोक) मोठा धोका निर्माण होतो, असे डॉ. थोरात यांनी आवर्जून नमूद केले आहे.
आरोग्य जपण्यासाठी आहारावर नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे सांगताना डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले की, उन्हाळ्याच्या दिवसात उच्च प्रथिने असलेले जड अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळावे. त्याऐवजी हलका आहार घ्यावा आणि सुती, सौम्य रंगाचे कपडे वापरावेत. शरीराला थंडावा देण्यासाठी चहा, कॉफी किंवा कृत्रिम थंड पेयांपेक्षा लिंबू पाणी, ताक आणि शहाळ्याचे पाणी यांसारख्या नैसर्गिक घरगुती पेयांना पसंती द्यावी. धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आरोग्यासाठी वेळ काढणे ही काळाची गरज बनली आहे.
विशेषतः वयोवृद्ध नागरिकांनी उन्हाच्या तीव्रतेपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे, कारण वाढत्या तापमानाचा त्यांच्या आरोग्यावर लवकर परिणाम होऊ शकतो. जर कोणाला उष्णतेमुळे शारीरिक त्रास जाणवू लागला, तर घरगुती उपाय करत न बसता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. ‘स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि स्वस्थ, मस्त व जबरदस्त रहा’ अशा शब्दांत डॉ. जयश्रीताई थोरात यांनी नागरिकांना आरोग्याचा मंत्र दिला आहे.






