संगमनेर – संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतल्यानंतर रस्त्यावरच हातगाड्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे करून वाहतुकीची कोंडी निर्माण करणारी बस स्थानकाबाहेरील अतिक्रमण पालिकेच्या माध्यमातून हटविण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून कोणतेही नुकसान न होता व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून घेतल्याने वारंवार या परिसरात अतिक्रमण मोहीम हटावचा फार्स ठरलेली ही अतिक्रमणे खरंच कायमस्वरूपी हटविली गेली का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. बस स्थानक परिसर मोकळा करण्यात आला असला तरी शहराच्या अन्य भागात नगरपालिकेने ही कारवाई करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वारंवार होणारी अतिक्रमणे संगमनेरकरांसाठी डोकेदुखी बनली असून ही अतिक्रमणे काढण्याची संकेत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिले होते.
याचाच एक भाग म्हणून मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाई बस स्थानक परिसरातील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाजवळील फुटपाथ मोकळे करण्यात आले आहेत. या फुटपाथ बाहेर लावण्यात आलेले लोखंडे अँगल जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले आहे. यावेळी बघायची गर्दी झाली होती.
फूटपाथवर गेल्या अनेक वर्षापासून बिनधास्तपणे फेरीवाले आपला व्यवसाय करत आहे. यामुळे मोक्याच्या व महत्त्वाच्या बस स्थानक परिसरात वाहतुकीची मोठी समस्या बनली आहे. बस स्थानकासमोर असलेला रिक्षा थांबा देखील इतरत्र हलवावा अशी मागणी आहे. मात्र याकडे देखील पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून सोयीस्कर दुर्लक्ष होतांना दिसत आहे. मंगळवारी काढण्यात आलेली अतिक्रमण ही मर्यादित स्वरूपाची तसेच कोणालाही नुकसान न पोहोचविणारी अशी होती.
आता संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला केलेल्या सूचनेप्रमाणे नगरपालिका, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी अतिक्रमण मोहीम कधी राबवते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

