संगमनेर – आनंदी आणि उत्साही कार्यक्रमात आपले चेहरे खुललेले दिसत नाही. या चेहऱ्यावर जे हास्य आणि आनंद असायला पाहिजे तो आनंद मला कुठेतरी कमी दिसतो. कदाचित काही लोकांना आपली चूकही मान्य झाली असेल. आकाश देखील ज्यांच्या कर्तुत्वाला गवसणी घालेल असे काम भाऊसाहेब थोरात आणि अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे. झाड वाढवायला, जगवायला त्याला सातत्याने पाणी द्यावं लागतं. बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रात काम करतो. भाऊसाहेबांनी लावलेले हे झाड कधी सुकू देऊ नका, या झाडाला सातत्याने पाणी देत राहा, असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, पुरस्कारार्थी माजी मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संभाजीराव कडू यांच्यासह शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन, शरयू व जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, दशरथ सावंत, मधुकर नवले, मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.
वडेट्टीवार म्हणाले भाऊसाहेब व अण्णासाहेबांसारखे नेतृत्व विदर्भाला मिळाले असते तर… सहकार, शिक्षणासह विविध क्षेत्रात सर्व दृष्टीने विकास झालेले राज्यातील जे पाच मतदार संघ त्यात संगमनेरचा क्रमांक तिसरा आहे. संगमनेरचा राज्यात तिसरा क्रमांक आमचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आणला आहे. विदर्भाला जर भाऊसाहेब थोरात सारखं नेतृत्व मिळाला असतं तर विदर्भातील आत्महत्या थांबल्या असत्या. अण्णासाहेब शिंदे सारखं नेतृत्व विदर्भाला मिळालं असतं तर माझ्या शेतकऱ्याने कधीही कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्या केल्या नसत्या. एवढी मोठी महान उंचीची ही माणसं होती.
पुस्तकातून कर्तुत्व मोजता येणार नाही – पुढच्या पिढीने काहीतरी घ्यावं यासाठी त्यांनी केलेल्या कामाला सातत्याने उजाळा मिळायला हवा. पुढच्या पिढीने त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला हवे. ही यामागील इच्छा आहे. एखाद्या पुस्तकांमधून त्यांचं कर्तृत्व मोजता येणार नाही एवढ्या महान उंचीची ही माणसं होऊन गेली.
संगमनेर महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी कार्यशाळा – येथून जाताना इथला विकास पाहून आमच्या नजरा येथील विकास पाहून भिरभिर बघत असतात. दोन-चार दिवस थांबून येथे काही शिकून जावं. खरंतर ही महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी भविष्यातील एक कार्यशाळा आहे. काम कसं करावं नेतृत्व कसं उभं राहावं हे या ठिकाणी शिकायला मिळतं.
तुम्ही कुठेतरी चुकला – राजकारणातला संयम आणि बाळासाहेबांचे मार्गदर्शन सभागृहात आम्हाला हवं होतं. हे सांगताना अत्यंत दुःख होते की, तुम्ही कुठेतरी चुकला आहात. स्वतःच आयुष्य सुंदर करणारे अनेक मिळतील मात्र भाऊसाहेब आणि अण्णासाहेब यांच्यासारखे इतरांचे आयुष्य सुंदर करणारे कधीही मिळणार नाही.
दुसऱ्यासाठी खड्डा खोदाल तर एक दिवस तुम्ही त्यात पडाल – अलीकडच्या काळात बदल्याचं राजकारण सुरू झाला आहे. एका खात्याचे कधी दोन खाते केल्याचे यापूर्वी कधी बघितले नाही. मात्र एका खात्याचे दोन तुकडे होताना या महाराष्ट्राने आता बघितले आहे. एकाला चने आणि एकाला फुटाणे वाटून दिले आहे. जे पेराल तेच उगवेल म्हणून दुसऱ्यासाठी खड्डे खोदाल तर एक दिवस तुम्हालाही खड्ड्यात पडाव लागेल, अशा प्रकारचं राजकारण करू नका हे राजकारण जनतेच्या हिताचे नसते लोकांना नजरेपुढे ठेवून काम करायचं असतं, हे न करता बदला घेण्याचं राजकारण करू नका असा सल्ला त्यांनी नाव न घेता विखे यांना दिला. 

