संगमनेर – भाऊसाहेब थोरात व अण्णासाहेब शिंदे हे दोघेही पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यक्तित्व पुढच्या अनेक पिढ्यांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल असे आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले.
रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, पुरस्कारार्थी माजी मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संभाजीराव कडू यांच्यासह शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन, शरयू व जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, दशरथ सावंत, मधुकर नवले, मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.
टोपे म्हणाले, संगमनेरच्या माळरानावर कारखाना उभा करण्याचे व्हिजन, दूरदृष्टी मोठी होती. हे सर्व शिकण्यासारखे व अनुकरणीय असं आहे. हे साम्राज्य वैभव त्यांनी उभे केले. त्याचे फळ खाणारे लाभार्थी आपण आहोत. शिस्त, त्याग, नैतिकता जपल्याशिवाय प्रचंड कष्ट उपवासल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे कार्य आजही आपल्यासाठी मार्गदर्शनीय आहे. कार्यक्षेत्र बाहेरील ऊसाला देखील चांगला भाव दिला पाहिजे असं नैतिकता जपणारा व्यक्तिमत्व भाऊसाहेबांचे होतं.
भाऊसाहेबांनी सहकाराच्या माध्यमातून पक्क फाउंडेशन केलं. त्यावर कळस चढविण्याचे काम बाळासाहेबांनी केल आहे. व्यवहारात पारदर्शक काटकासर त्यांनी समर्पित भावनेने अंगीकारली.
पुरस्काराची रक्कम गोरगरिबांच्या शिक्षणासाठी सत्कारणी लावला जाईल, वापरला जाईल हेच त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रती अभिवादनाचे कार्य असेल.
सहकार अलीकडे लोप पावत चालला आहे. एकेकाळी दीडशे सहकारी साखर कारखाने होते. आता सहकाराचे कमी कारखाने राहिले असून खाजगी साखर कारखाने वाढले आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आपला जीडीपी वाढला असेल पण सहकार आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या उन्नतीचा मार्ग आहे. सहकार एक संस्कृती आहे. या संस्कृतीचे संवर्धन करणे अलीकडच्या काळात गरजेचं आहे.
आपण कमावलेली भाकरी आपण खाणं म्हणजे प्रकृती, दुसऱ्यांची भाकरी हिसकावून घेऊन खाणे त्याला विकृती आणि आपली कमावलेली भाकरी त्यातून दुसऱ्याला अर्धी देणे याला आपण संस्कृती म्हणतो. ही संस्कृती सहकाराने आपल्याला शिकविली असून ती पुढील काळात पुढील काळात आपल्याला जपावी लागेल.
मला जो पुरस्कार दिला त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. बाळासाहेब थोरात यांनी नेहमी मंत्रिमंडळात आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत हे न बघता एका लहान भावाप्रमाणे सातत्याने प्रेम, विश्वास दिला चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांच्याबद्दल मनापासून सकारात्मकतेचा भाव आहे.
जे कारखान्याचे जन्मदाते असतात, त्या घराला त्या कुटुंबाला जी काळजी असते ती दुसरी कोणालाच असू शकत नाही. जन्मदात्या आईला मुलाची जी काळजी असते तेवढीच काळजी जन्मदात्या कुटुंबाला असते. त्यामुळे आपण आपलं नेतृत्व जपलं पाहिजे. आज दुर्दैवाने चांगला विचार लोप पावत चालला आहे. पैशाच, धर्माच, जातीचे राजकारण, स्वार्थपणा वाढला. पुढील काळात विचारत राजकारण आपण जपलं पाहिजे. आत्ताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती आपली जबाबदारी आहे. नाहीतर परिस्थिती वाईट आहे. पश्चाताप होऊ शकतो, असे टोपे म्हणाले.

