अहिल्यानगर ता. १७ – ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला चालना मिळून गावकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्वामित्व योजनेंतर्गत ५० लाख मालमत्ता पत्रकाचे वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे.
शनिवारी (१८ जानेवारी) रोजी दुपारी १२-३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागामार्फत आतापर्यंत ३ लाख १७ हजार गावांमधून ड्रोनद्वारे सर्व्हेचे काम पूर्ण करण्यात आले असुन १ लाख १९ हजार गावांमधून २ कोटी १९ लाख मालमत्ता पत्रक तयार करण्यात आलेले आहेत. मालमत्तेवर कर्ज उपलब्ध होणे, मालमत्तेचे विवाद कमी होणे, ग्रामपंचातीला गावविकास नियोजनात सुलभता प्राप्त होणे, पंचायतीला स्वउत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा परिचय करुन देत ग्राम परिवर्तनाचे असाधारण सामर्थ्य या योजनेमध्ये आहे. 





