विशेष प्रतिनिधी / मुंबई-
बदलापूर येथील चिमुरड्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने तत्कालीन सरकारचे फेक नरेटिव्ह उघड पाडलेत. न्यायालायाने चौकशी अहवालात हे एन्काउंटर घडवून आणल्याचं म्हटल्याने सरकारची चांगलीच कोंडी झाली. या एन्काऊंटरला पोलीस जितके जबाबदार आहेत, तितकेच जबाबदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत काढण्यात आलाय. पोलिसांकडील बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आलंय. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झाली नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचं फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आलंय, असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केलीय, असे ते म्हणाले. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे, तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असा आरोप त्यांनी केलाय. कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा दुसरा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येतोय, अशी टीका त्यांनी केलीय. वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजपा संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही, तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करून भाजपाशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटरचे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू आता समोर येत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.




