संगमनेर दि. २७-
संगमनेर शहरामध्ये शासकीय विश्रामगृहासमोरील चांदणी खानावळी समोर ‘गावचा सरपंच होऊ दिले नाही’, या कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी शनिवारी रात्री १९ दिवसानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते (दोघे रा. सोनोशी, ता. संगमनेर) व आकाश संतोष चकोर (रा. पिंपळे ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. ७ जानेवारीला घडलेल्या या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल १९ दिवसांचा कालावधी लागला आहे.
शहर पोलीस ठाण्यात सोनोशी येथील उपसरपंच राजेंद्र तुकाराम सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६४, भारतीय न्याय संहिता कलम ११५, ११८(१), ३२४(२), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार धनंजय महाले या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
अधिक माहिती अशी, फिर्यादी राजेंद्र सानप हे त्यांचा मित्र अनिकेत दशरथ गीते यांच्यासह संगमनेर येथे आले असताना शासकीय विश्रामगृह समोरील चांदणी खानावळीमध्ये जेवणासाठी थांबले होते. मात्र तेथे जेवण न मिळाल्याने ते खानावळी बाहेर समोर उभे असताना त्याचवेळी त्यांच्या सोनोशी गावातील सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते व आकाश चकोर हे तेथे आले.
यावेळी सोमनाथ गीते याने “तू मला गावचा सरपंच होऊ दिले नाही, असे म्हणून तू जास्त माजला आहे” असा दम देत वाईट शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोमनाथ गीते व अमोल गीते यांनी लोखंडी गज आणून सानप यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर मारले. सोबत असलेल्या आकाश चकोर याने देखील लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी सानप यांच्यासोबत असलेल्या मित्र अनिकेत याने भांडणात मध्यस्थी करत सोडवा सोडवी केली. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. मात्र मारहाणीत सानप यांच्या डाव्या खांद्याला आणि डाव्या हाताच्या बोटांना मार लागला होता.
दरम्यान घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सानप यांना झालेल्या मारहाणीबाबत वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने सानप यांच्या तक्रारीवरून सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते व आकाश संतोष चकोर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


