विशेष प्रतिनिधी | मुंबई
वाल्मिक कराड याची गु्न्हेगारी, दहशत आणि अवैध धंदे रोखण्यासाठी बीडमधील पोलीस दलात मोठे बदल करत पोलीस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली. वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र तुरुंगातही त्याची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
तर बीडमध्ये २६ पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, तृप्ती देसाई यांनी सांगितलेला आकडा फार कमी आहे. वाल्मिक कराडच्या दिमतीला असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांची बेरीज केली तर २०० पेक्षा जास्त हा आकडा जाईल. लवकरच या सर्वांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे आमदार धस म्हणाले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाने जिल्ह्याचे संपूर्ण राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी यांच्यावरही आरोप होत आहेत. या सर्वांना जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या कृपेनेच आणले गेले आणि त्यांच्या आशीर्वादानेच हे काम करतात असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे
बीड जिल्ह्यातील पोलीसांचे आकावर (वाल्मिक कराड) खूप प्रेम आहे, असा आरोप आमदार धस यांनी केला. पोलीस अधीक्षकांनी अशा अधिकाऱ्यांना अजून पोलीस दलात ठेवलेच कसे? असाही सवाल आमदार धस यांनी केला आहे. बीडचे डीवायएसपी आकाचेच आहेत. वाल्मिक कराडचे पाय चेपायला कोणते पोलीसवाले माणसं आत सोडत आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे, असा खळबळजनक दावा सुरेश धस यांनी केला आहे.



