संगमनेर दि. ३१ –
संगमनेर तालुका हा मोठा असून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार आश्वीला अपर तहसील कार्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र काही विरोधक जनतेत गैरसमज पसरवून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. नागरिकांच्या सोयीसाठीच नविन बदल केला जात आहे, मात्र या संदर्भात अद्याप कुठलाच निर्णय झाला नाही. जनतेच्या सुचना व मागणीचा आदर करूनच अपर तहसीलचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली असल्याचे माध्यमातील वृत्तांत म्हटले आहे.
गेल्या काही दिवसापासून आश्वी बुद्रुक तहसील कार्यालयाबाबत जनतेत गैरसमज पसरविण्यात येत असून खुलासा करण्यासाठी गुरूवारी शासकिय विश्रामगृहामध्ये काही पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रस्ताव तयार केला होता. तो अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे, या संदर्भात जनतेची मते जाणून घेऊन त्यावर चर्चा होऊन निर्णय होणार आहे. मात्र तहसील कार्यालयातील एका अतिउत्साही कर्मचाऱ्याने हा प्रस्ताव विरोधकांना पाठवला. त्याचा शोध घेऊन कारवाई केली जाणार आहे. तहसीलदारांना तसे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.
बाहेर आलेल्या पत्रावर जावक नंबर नाही, सही नाही, कच्चा मसुदा आहे. तोच अध्यादेश असल्याचे भासवून त्याचे राजकीय भांडवल करून तालुक्यात गैरसमज पसरविण्यात आला. हा निव्वळ प्रस्ताव आहे आदेश नाही. या संदर्भात या विचारणा होऊ लागल्याने खुलासा करणे गरजेचे होते. या तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी आहे. या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. जनतेची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जातात.
अपर तहसीलबाबत देखील चर्चा केली जाणार आहे. अपर तहसील कार्यालयाबाबत माहिती न घेता अर्धवट माहितीवर अपप्रचार केला आहे. अनेकांना पराभव पचवता आला नाही, अजूनही ते सावरू शकले नाही. यामुळे तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे. चाळीस वर्षात विरोधकांनी फक्त राजकारण केले आहे.
जर अपर तहसील कार्यालय सोयीचे नसेल तर निर्णय होणार नाही. नागरिकांनी विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
आत्ताच आंदोलने का वाढली… सध्या जिल्हा बँकेत भरती बाबत वाद सुरू आहे, आरक्षणाशिवाय भरती करू नये अशी मागणी होत आहे. मात्र यावर तालुक्यातील संचालक व उपाध्यक्ष आपली भूमिका का स्पष्ट करत नाही असा सवाल करून नेमके आत्ताच यावर आंदोलने का वाढली याचा शोध घेतला पाहिजे. – अमोल खताळ, आमदार.


