अहिल्यानगर दि.१-
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगस्नेही वातावरणासाठी सुपा व अहिल्यानगर औद्योगिक वसाहत क्षेत्राच्या हद्दीतील अतिक्रमणे तातडीने काढण्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिले.
शनिवारी (१ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सुपा व पारनेर औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पारनेरचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत चिंचकर, तहसिलदार श्रीमती गायत्री सौंदणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे म्हणाले, जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये अधिकाधिक उद्योग येऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याला शासनामार्फत प्राधान्य देण्यात येत आहे. सुपा व अहिल्यानगर औद्योगिक वसाहतीच्या हद्दीमधील अतिक्रमणे आणि नियमबाह्य टपऱ्याबाबत ठोस कारवाई करत येत्या १५ दिवसांमध्ये करावी. औद्योगिक वसाहतीच्या हद्दीतील परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कामगार विभाग, प्रदुषण महामंडळ तसेच औद्योगिक विकास विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या तपासणी करत प्रदुषणांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती जमा करावी. कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या प्रमुखांसमवेत बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचनाही विखे यांनी यावेळी केल्या.
बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

