शहाणा होईल तो माणूस कसला, अशी बोली म्हण आहे. मरणासाठी तो कुठल्याही संकटाची तमा बाळगत नसतो. वाईच्या मांढरादेवीच्या गडावर घसरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संकटाची तमा जे बाळगत नाहीत, त्यांना काही सांगून डोकं चालवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. याने मरण आलंच तर आदळआपट करायची आणि गप्प बसायचं. प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात चेंगरून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या प्रति असंच म्हणता येईल. सारासार विचार करणारा माणूस तिथे मरायला जाणार नाही. ज्याला श्रध्देचं ठिकाण मानलं जातं तिथेच अशा घटना घडतात. मात्र श्रध्दा म्हणून कोणी कोणाला वाचवायला येत नाही. पवित्र स्नान केल्याने पापं धुवून निघतात आणि मोक्ष मिळतो, असं मानायच्या ठिकाणी ३० जण मोक्षाला गेले. असा मोक्ष कोणी पाहिला नाही, की त्याने अनादी काळ कोणी जगलाही नाही. तेव्हा पाप धुवून निघणं आणि मोक्ष मिळणं या त्याहून पुढच्या गोष्टी. तरी लोकं तिथे जातात. अशी पवित्रता प्राप्त झाली असती तर सारं काही अलबेल असतं. पण जिथे अज्ञानच ओतप्रोत भरलंय तिथे पाप आणि मोक्षाच्या गोष्टी सांगून काही उपयोग नाही.
रविवार विशेष लेख… प्रयागराज ते ‘कुंभ’राज…
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.



यावर्षी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात ४० कोटी लोकं येणार असल्याचं जाहीर झाल्यापासून संकटाची चाहूल प्रशासनाला आली नाही, हेच अजब म्हटलं पाहिजे. ज्याला आता प्रयागराज असं संबोधलं जातं ते पूर्वीच अलाहाबाद. या अलाहाबादमध्ये १९५४ च्या फेब्रुवारी महिन्यात असाच महाकुंभ मेळा भरला होता. तेव्हा हत्ती उधळला आणि चेंगराचेंगरीत ८०० लोकांचा बळी गेला. आता हत्ती उधळण्याऐवजी लोकंच स्वत:ला उधळवतात. स्वत:च हकनाक मरणाच्या दारी जातात तरी त्यांना शहाणपण येत नाही. या घटनेनंतर अशा गर्दीच्या ठिकाणी कोणी जाऊ नये, असं आवाहन तत्कालीन सरकारने केलं होतं. या सरकारला तितकीही अक्कल नाही. आजवर असं आवाहन करणारे हे नेत्यांना मानणारे होते. नेत्यांकडे विवेक नावाची गोष्ट होती. देवाला भजून पोटं भरणार नाहीत, असे खडेबोल सुनावणार्यांचे दिवस होते. आज पोट जळलं तरी चालेल मात्र भगवे नाचवलेच पाहिजेत, अशी शिकवण नेत्यांची आहे.
या शिकवणीनेच महाकुंभचा हादसा घडला. १९८६ च्या कुंभमेळ्यात ५० लोकांचा मृत्यू झाला आणि १९९२ च्या हरिद्वार येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तितक्याच लोकांचा बळी गेला. २००३ च्या नाशिकमध्ये भरलेल्या कुंभमेळ्यात नागांनी उडवलेली नाणी मिळवण्याच्या हव्यासाने गर्दीत ३० जणांचा बळी गेला होता. २०१३ च्या कुंभमेळ्यादरम्यान याच अलाहाबादच्या रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यात २९ महिलांचा समावेश होता. सुरू असलेल्या कुंभमेळ्यात काही दिवसांपूर्वी टेंटमधल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात अग्नीतांडव झालं. शेकडो टेंट आगीत भस्मसात झाले. सुदैवाने तिथे प्राणहानी झाली नाही. इतकं होऊनही माणसं विचार करायला तयार नाहीत, हे दुर्देवाहून अति झालं.
वाईट वाटतं ते माध्यमांचं. एखाद्या मुख्यमंत्र्यांची छबी झळकवण्यासाठी जिथे कोट्यवधींचा मलिदा रसद म्हणून वाटला जातो, त्या रसदीसाठी माध्यमं किती लाचार बनलीत याचं मूर्तीमंत उदाहरण प्रयागराजच्या दुर्देवी घटनेच्या वृत्तांकनात दिसून आलं. आम्ही लाचारीसाठी किती मुर्दाड झालोत हे माध्यमांनी विशेषत: वृत्तवाहिन्यांनी दाखवून दिलंय. कोणा विरोधकांच्या राज्यात वा विरोधी पक्षांबाबतीत असं काही घडलं असतं तर दिवसभर गोंधळ घातला गेला असता. आता सत्ताधार्यांसाठी स्वत्व विकलेल्या वृत्तवाहिन्यांची लाचारी प्रयागराच्या घटनेत उघडपणे पहायला मिळाली. जणू काही घडलंच नाही, अशा तोर्यात माध्यमांचा वावर होता. कुंभमेळ्याचं रिपोर्टींग एकांगी होण्यासारख्या वृत्तांकनासाठी जिथे कोट्यवधी रुपये खर्ची घातले गेले तिथे माणसाच्या मरणाला किंमत येण्याचा प्रश्नच नाही. एका प्रथितयश वर्तमान पत्राच्या संपादकीयाने तर लाज कोळून प्यायल्याचं दाखवून दिलं. घटनेचं वृत्तांत देण्याऐवजी मेळ्यात सारं काही ठीक असल्याचं दाखवण्यासाठी वापर केलेला दिसला. मात्र दुर्घटनेच्या कारणांवर बोलण्याची हिंमत दाखवू शकला नाही. लाचार बनल्यावर संपादकीयमध्ये ब्र काढायची हिंमत कुठून येणार?
मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर गंगेत डुबकी घेणार्यांनी घाटाजवळ गाढ झोपलेल्यांना तुडवलं. त्यांच्यामागून येणारा रेटा एकमेकांवर रेटला. इतक्या गंभीर घटनेनंतर ज्यांना रुग्णालयात नेलं तिथे माध्यमांच्या प्रतिनिधींना बंदी करण्यात आली होती. एकाही बातमीचा लवलेश नव्हता. जागतिक स्तरावरील वृत्त असतानाही माध्यकांकडे बातमी नसणं हे कदापि शक्य नाही. पण दुसरीकडे केंद्रिय प्रसारमाध्यम अमृतस्नानाचं वृत्तांत देण्यात मग्न होतं. यावरून माध्यमांची झालेली अवस्था लक्षात येते. माणसाच्या मरणाला आपल्या माध्यमांप्रति असलेली किंमत या सगळ्या प्रकरणातून लक्षात येईल.
सुमारे ९० हजार कोटींच्या निधीचा चुराडा करणार्या या मेळ्यात श्रध्दाळूंचा असा मृत्यू होणं हे प्रशासनाचं पूरतं अपयश होय. वाढतं व्हीआयपी कल्चर अशा असंख्य घटनांचं कारण ठरतं. याहीवेळी हेच कारण पुढे आलंय. पवित्र स्नानाचं निमित्त करत व्हीआयपी अशा ठिकाणी येतात यामुळे अपेक्षित क्षणाच्या वेळी लोकांना स्नान करता येणार नाही, अशा भीतीने रेटारेटी झाली आणि त्याचे परिणाम व्हायचे ते झाले. यापूर्वी कुंभमेळ्याला येणार्यांना कोणतीही सुरक्षा दिली जाणार नाही, अशी सक्त ताकीद दिली जायची. आता सारेच भगवेधारी असल्याने आणि त्यांचा म्होरक्याच भगव्यात वेढला गेल्याने तत्कालीन सरकारच्या सूचनांचा अंमल करण्याचा विचार येणंच अशक्य. उलट अशा मेळ्यांचं श्रेय लाटण्याची अहमहिका लागली आहे. योगी मंत्रिमंडळातील मंत्री संधी मिळेल तेव्हा आणि तिथे लावाजमा घेऊन जात आपली छबी काढतात. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेळ्याला १२ वेळा भेटी दिल्या.
आदित्यनाथ यांच्या सरकाच्या विविध योजना हा देशातील सर्वच माध्यमांचा चर्चेचा विषय असतो. योगींना देशाचं पंतप्रधान व्हायचं असल्याने ब्रॅण्डिंगने त्यांना वेडं बनवलं आहे. सुविधांहून ब्रॅण्डिंगच्या बोलबाल्याने देशभर ढोल पिटले जात आहेत. मार्केटिंगवर केलेला खर्च सुविधांवर केला असता तर अशी घटना घडली नसती, हे तिथे पोहोचलेल्यांचं म्हणण अगदीच गैर नाही. या व्यासपीठाचा वापर हा आपल्याला दिल्लीपर्यंत जायला पुरेसा आहे, हे लक्षात घेऊन स्वत:च्या छबीला चमकवण्याचे उद्योग या माध्यमातून सुरू आहेत. हिंदूंच्या अस्मितेचा गैरफायदा घेणं, या एका हेतूने सारं सुरू आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू आहे.