विशेष प्रतिनिधी / प्रवीण पुरो
मुंबई – ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही. निधी पाहिजे, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा दम आणि आगाऊपणाची भाषा राज्याचे वादग्रस्त मंत्री नितेश राणे यांनी वापरली आहे.
नितेश राणे यांच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे का? असा सवाल शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून उपस्थित केला आहे.
भाजपच्या ओरोस मंडलचा कार्यकर्ता मेळावा ओरोस येथे भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे नेते अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, अशोक सावंत, रणजित देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, “जिल्हा नियोजन समिती किंवा सरकारचा कुठलाही निधी असेल, तो फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना मिळेल. बाकी कुणालाही मिळणार नाही. मी माझ्या लोकांना ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सरपंच असलेल्या गावांची यादी काढण्यासाठी सांगितलं आहे. ज्या गावांत ठाकरे किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, तिथे एक रूपयांचा सुद्धा निधी देणार नाही.
गावाचा विकास करायचा असेल, तर भाजपमध्ये प्रवेश करा. भरपूर निधी मिळेल. अन्यथा विकास होणार नाही, असा अजब सल्ला त्यांनी उपस्थिताना दिला.
येणार्या निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजप हे उद्दिष्ट कायम असायला हवं, त्यासाठी मैत्रीपूर्ण लढत झाली तरी चालेल, कारण निवडून येणारे महायुतीचेच असणार आहेत. चुकून विरोधी पक्षाचं कुणी आलेच तर त्यांनाही आतमध्ये घेऊ. भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना मदत करू नये, असा दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरला.
नितेश राणे यांच्या विधानावरून नवा वाद उफाळला आहे. सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’ अकाउंटवर ट्विट केले आहे. विश्वगुरू होण्याची भाषा करणारे पंतप्रधान आणि ऑपरेशन ब्लॅकमेलर राबवणाऱ्या पक्षाने हा व्हिडिओ बघितल्यानंतरही या देशात लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे, यावर भाषणे द्यायला हवीत काय? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

